कोरोनाची लस पहिल्यांदा कोणाला देणार; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात….

| Updated on: Oct 12, 2020 | 8:23 AM

चाचणीतून पुढे येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारावर लसीचा वापर करायचा किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल.

कोरोनाची लस पहिल्यांदा कोणाला देणार; केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात....
Follow us on

नवी दिल्ली: देशात कोरोनाची लस उपलब्ध झाल्यास तिचा सर्वप्रथम लाभ आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना मिळू शकतो, असे संकेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन (Dr Harsh Vardhan) यांच्याकडून देण्यात आले आहेत. देशात कोरोनाच्या लसीचे कशाप्रकारे वितरण होईल, याविषयी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली. कोरोनाची लस उपलब्ध झाल्यास ज्यांना या विषाणूचा व्यावसायिक स्तरावर जास्त धोका आहे किंवा जे लोक विषाणूच्या संपर्कात येण्याची शक्यता अधिक आहे, अशांना सर्वप्रथम लस टोचली जाईल, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले. (distribution of Covid vaccines)

तसेच सध्या भारतात उपलब्ध असणाऱ्या कोरोना लसीचा रुग्णांवर वापर होऊ शकतो का, यावरही डॉ. हर्ष वर्धन यांनी भाष्य केले. सध्या या कोरोना लशींची चाचणी सुरु आहे. त्यामधून पुढे येणाऱ्या निष्कर्षांच्या आधारावर लसीचा वापर करायचा किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. चाचणीतून पुढे आलेले निष्कर्ष हे खात्रीशीर असले पाहिजेत. तसेच यामध्ये रुग्णाच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असेल, हेदेखील डॉ. हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले.

‘सण हे भव्यदिव्य पद्धतीनेच साजरे करावेत, हा दंडक नव्हे’

सण हे भव्यदिव्य पद्धतीनेच साजरे व्हायला पाहिजे, असे कोणत्याही धर्मग्रंथांत लिहून ठेवलेले नाही अथवा कोणत्याही देवाने तसे सांगितले नाही. त्यामुळे कोरोना काळात सण साजरे करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. अन्यथा देशावर मोठे संकट ओढावेल, असा इशारा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिला आहे.

लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर सणांच्या काळात देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले होते. या पार्श्वभूमीवर रविवारी झालेल्या एका ऑनलाईन कार्यक्रमात डॉ. हर्षवर्धन यांनी देशवासियांना सावधानता बाळगण्याची सूचना दिली.

सणांच्या काळात आपल्याला अधिक दक्ष राहिले पाहिजे. उत्सव हे भव्यदिव्य पद्धतीनेच साजरे केले जावेत, असे कोणताही धर्मग्रंथ किंवा देवाने म्हटलेले नाही. त्यामुळे सणांच्या काळात लोकांनी मोठ्या संख्येने एकत्र जमणे टाळायला पाहिजे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास देशावर मोठे संकट ओढावू शकते, असे डॉ. हर्ष वर्धन यांनी म्हटले.

असामान्य परिस्थितीशी सामना करताना आपला प्रतिसादही तसाच असला पाहिजे. सणांच्या काळातही लोकांनी याचे भान राखले पाहिजे. सण म्हणजे मंडप, मंदिरे किंवा मशिदीत एकत्र जमून भव्यदिव्य स्वरुपातच साजरा व्हावा, असे कुठेही लिहून ठेवलेले नाही, ही गोष्ट डॉ. हर्ष वर्धन यांनी अधोरेखित केली.

संबंधित बातम्या:

मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घाईघाईत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांचा सबुरीचा मंत्र!

(distribution of Covid vaccines)