तीन दिवसात अंत्यविधी उरकले, आईचं दु:ख मागे सारुन पुन्हा मैदानात, राजेश टोपेंचा झंझावात

| Updated on: Aug 09, 2020 | 10:08 PM

"आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय", असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले.

तीन दिवसात अंत्यविधी उरकले, आईचं दु:ख मागे सारुन पुन्हा मैदानात, राजेश टोपेंचा झंझावात
Follow us on

सातारा : आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या आई शारदा टोपे यांचं 1 ऑगस्ट रोजी दु:खद निधन झालं. त्यांच्या निधनानंतर राजेश टोपे यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र, राज्यात कोरोनामुळे भीषण परिस्थिती असल्यामुळे राजेश टोपे यांनी संयमीपणे या दु:खाला पाठीमागे सारत कोरोनाविरोधाच्या लढाईत फ्रंट लाईनवर काम सुरु आहे.

राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली आज (9 ऑगस्ट) साताऱ्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी आईविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आपल्या आईनेच कर्म करण्याची शिकवण दिली, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

“आईच्या मृत्यूनंतर तीन दिवसाच्याआत संपूर्ण अंत्यविधीचे सोपस्कार करुन कामाला लागलोय. माझे प्रेरणास्थान शरद पवार आहेत. ते सातत्याने काम करत आहेत. वयाच्या 80 व्या वर्षी ते लोकांमध्ये जावून त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. लोकांना प्रोत्साहन देत आहेत. लोकांची भीती घालवत आहेत”, असं राजेश टोपे म्हणाले.

“लीड फ्रॉम फ्रंट, ही प्रेरणा शरद पवारांची आहे. त्यामुळे खरी परिस्थिती कळते. त्याचबरोबर माझ्या आईने आणि वडिलांनी मला कर्म करण्याची शिकवण दिली. आपल्या गीतेतही कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन असा स्पष्ट उल्लेख आहे. त्याप्रमाणे कर्म करणं महत्त्वाचं आहे. या शिकवणीनुसार मी काम करत आहे”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितलं.

दरम्यान, “सिरम इन्स्टिट्यूटची चाचणी प्रगतीपथावर आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी लसीसाठी चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांची संपूर्ण प्रक्रिया लवकर पार पडली तर महिना दोन महिन्यात या लसी उपलब्ध होऊ शकतील”, असंही राजेश टोपे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सांगितलं.

“सातारा आणि कोल्हापूरचा कोरोना आढावा घेतला. कोल्हापुरचा पॉझिटिव्ह रेट 35 टक्के असून तो दहा टक्क्यांच्याआत आणायचा आहे. यासंदर्भात मोठ्याप्रमाणात टेस्टिंग करणे गरजेचे आहे. राज्याचा आणि या दोन्ही जिल्ह्यांचा मृत्युदर हा सारखा आहे. तोसुद्धा एक टक्के पेक्षा कमी करण्याचा आहे. त्यासाठी रुग्णाला लवकर निदान करण्यावर भर आहे. यासाठी मुंबई एक्स्पर्ट बोलावलं जाईल”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती.

संबंधित बातम्या :

कोरोना वॉरियर पोरका झाला! आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक

आरोग्य विभागात मेरिटवर भरती, स्थगितीतून वगळावे, कराड दौऱ्यात राजेश टोपेंची भूमिका