नाशिकमध्ये गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी

| Updated on: Oct 06, 2019 | 7:49 PM

गंगापूर धरणातून 20 हजार क्युसेक्सने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी काठची मंदिर-दुकानं पाण्याखाली गेली. तर दुतोंडया मारुतीच्या डोक्यावरुन पाणी गेले आहे.

नाशिकमध्ये गोदावरीला पूर, दुतोंड्या मारुतीच्या डोक्यापर्यंत पाणी
नाशिकमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Follow us on

नाशिक : गेल्या आठ दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे दारणा, कडवा, भावली, गंगापूर, पालखेड, वालदेवी या गोदावरी खोऱ्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याशिवाय नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाणी येत असल्याने निफाड तालुक्यातील सायखेडा, चांदोरी, करंजगाव आणि शिंगवे या गावांना या पुराचा फटका बसला आहे. तसेच त्र्यंबकेश्वरमध्ये गेल्या 24 तासात रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये एका दिवसात तब्बल 300 मिमी पाऊस पडला आहे.

त्याशिवाय त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. धरण क्षेत्रात पाऊस जास्त असल्याने गंगापूर धरणातून 20 हजार क्युसेक्सने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी काठची मंदिर-दुकानं पाण्याखाली गेली. तर दुतोंडया मारुतीच्या डोक्यावरुन पाणी गेले आहे.

सराफा बाजारात पाणी

तसेच अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या सराफ बाजारात मोठ्या प्रमाणात पाणी भरलं आहे. तसेच मिलिंदनगरमध्येही पावसाचं पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतं आहे. विशेष म्हणजे महापूराची निशाणी समजल्या जाणाऱ्या नारोशंकराच्या घंटेपर्यंत पाणी पोहोचलं आहे.

दरम्यान गोदावरी आणि दारणा नदीतून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. तर नांदूरमध्यमेश्वर धरणातून तब्बल एक लाख 56 हजार विशेष पाण्याचा विसर्ग गोदापत्रात केला जात आहे. त्यामुळे सायखेडा चांदोरी गावांना पाण्याचा वेढा बसला असून गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

450 लोकांचे स्थलांतर

दरम्यान पूराचा वेढा बसलेल्या गावांमधील 100 कुटुंबातील 450 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सायखेडा पुलावर पाणी आल्याने सायखेडा गावातील नागरिकांचा चांदोरी नाशिककडे जाणारा संपर्क तुटला आहे.