हिंगोलीत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात 37 SRPF जवानांना लागण, रुग्णसंख्या 90 वर

| Updated on: May 05, 2020 | 12:39 PM

हिंगोलीत 24 तासांच्या आत 37 एसआरपीएफ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. (Hingoli SRPF Jawan Corona Positive)

हिंगोलीत कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट, 24 तासात 37 SRPF जवानांना लागण, रुग्णसंख्या 90 वर
Follow us on

हिंगोली : हिंगोलीत ‘कोरोना’ रुग्णसंख्येचा अक्षरशः स्फोट झाला आहे. हिंगोली जिल्ह्यात राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी 14 जवानांचे रिपोर्ट ‘कोरोना’ पॉझिटिव्ह आले आहेत. काल रात्री 23 जवानांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं समोर आलं होतं, तर सकाळी आणखी 14 जवानांची भर पडल्याने 24 तासांच्या आत 37 एसआरपीएफ जवानांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित एसआरपीएफ जवानांची संख्या 84 वर गेली आहे. नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये एका नर्सचाही समावेश आहे. (Hingoli SRPF Jawan Corona Positive)

एसआरपीएफचे 23 जवान ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल काल रात्री उशिरा आला होता. हे सर्व जवान मुंबईत कार्यरत होते. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित एसआरपीएफ जवानांची संख्या 84 वर गेली आहे. यापैकी एक जण जालन्याचा आहे. उर्वरित जवानांपैकी 34 जण मालेगाव, तर 35 जवान मुंबईत कार्यरत होते. हिंगोलीतील कोरोनाबधितांची संख्या गेल्या 24 तासात 52 वरुन थेट 90 वर गेली आहे.

हिंगोलीत पूर्वीपासून आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या कोरोनाग्रस्त एसआरपीएफ जवानाचा 14 दिवसांनंतरचा रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय 24 वर्षीय परिचारिकेलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हिंगोली जिल्हा शल्यचिकित्सकाने याविषयी माहिती दिली.

हिंगोलीत कोरोनाबाधितांची संख्या 90 वर पोहोचली आहे. यापैकी एकाला डिस्चार्ज मिळाला आहे, तर 89 रुग्ण सध्या उपचाराधीन आहेत. याआधी, 1 मे रोजी एकाच दिवशी एसआरपीएफच्या 25 जवानांसह 26 कोरोनाग्रस्त सापडले होते. त्यानंतर कालच्या दिवसात हिंगोलीत मोठ्या प्रमाणावर नवे कोरोनाग्रस्त आढळले.

हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा 15 दिवसांपूर्वी झाली होती, मात्र इतक्या कमी  कालावधीत रुग्णसंख्या फोफावून  75 च्या पार गेल्याने धाकधूक वाढली आहे. हिंगोलीवासियांचं कोरोनामुक्त झाल्याचं स्वप्न आधी एकदा विरलं होतं, आता रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने उलट चिंता वाढत आहे.

हेही वाचा : हिंगोली जिल्हा 4 वाजता ‘कोरोना’मुक्त, 8.30 वाजता सहा नवे रुग्ण

याआधी, हिंगोली जिल्ह्यातील पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट 16 एप्रिलला निगेटिव्ह आला होता. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 21 एप्रिलला दुपारी चार वाजता हिंगोली जिल्हा ‘कोरोना’मुक्त झाल्याची घोषणा केली होती, मात्र त्याच दिवसात, अवघ्या साडेचार तासांमध्ये सहा नवे रुग्ण आढळल्याने हिंगोली जिल्ह्याची ‘कोरोना’मुक्ती औटघटकेची ठरली होती.

त्यावेळी एसआरपीएफच्या सहा जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.  मालेगाव आणि मुंबईतून हिंगोलीत आलेल्या 194 जवानांना क्वारंटाइन करुन ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी 95 जवानांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते, तर सहा जवानांना कोरोनाची लागण झाली होती. आता पुन्हा एसआरपीएफच्या जवानांना लागण झाल्याने भीती वाढली आहे.