3 मेनंतर लॉकडाऊन काढणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात…

| Updated on: Apr 27, 2020 | 6:07 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या बैठकीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लॉकडाऊनबाबत होणाऱ्या निर्णयाची सूचक माहिती दिली आहे (Anil Deshmukh on Lockdown)

3 मेनंतर लॉकडाऊन काढणार का? गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात...
Follow us on

नागपूर : कोरोना नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचं काय होणार? याविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आज (27 एप्रिल) पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यात अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख देखील सहभागी होते. त्यांनी बैठकीनंतर लॉकडाऊनबाबत होणाऱ्या निर्णयाची सूचक माहिती दिली आहे (Anil Deshmukh on Lockdown). जेथे मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळत आहेत तेथे लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.

अनिल देशमुख म्हणाले, “पंतप्रधान मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. राज्याचा गृहमंत्री म्हणून मीही त्यात सहभागी झाले होतो. पंतप्रधान मोदी यांच्यासोबत सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांची अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. यात झालेल्या चर्चेनुसार ज्या शहरात अजूनही कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आहेत, तेथे लॉकडाऊन काढले जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र, जे शहर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये आहेत, तिथे काही प्रमाणात सूट मिळू शकते. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः याबद्दल घोषणा करतील.”

“गृहसचिवांनी मानवी दृष्टिकोनातून वाधवान यांना अनुमती पत्र दिलं”

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान प्रकरणावरही भाष्य केलं. वाधवान कुटुंबाला लॉकडाऊनमध्येही प्रवास करण्याची अनुमती मिळाल्याच्या प्रकरणात वरिष्ठ आयपीएस अधिकारी अमिताभ गुप्ता यांची चौकशी झाली आहे. त्या चौकशीमध्ये अमिताभ गुप्ता यांनी त्यांचं विस्तृत उत्तर सादर केलं आहे. गुप्ता यांनी त्यांच्या उत्तरात वाधवान कुटुंबाला फक्त मानवी दृष्टिकोनातून अनुमती पत्र दिलं होतं, असं म्हटलं आहे. आता वाधवान कुटुंबाला सीबीआयकडे सुपूर्त केल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. यावेळी देशमुख यांनी या प्रकरणात राजकारण व्हायला नको होते असं मत व्यक्त केलं.

राज्यात मोठ्या संख्येने इतर राज्यातील मजूर अडकले आहेत. परप्रांतीय मजुरांचा त्यांच्या राज्यात परतण्यासाठी दबाव आहे. पंतप्रधानांसोबत आज त्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्री त्याबद्दल माहिती देतील. राज्य सरकार सर्व मजुरांची काळजी घेत आहे, असंही त्यांनी यावेळी नमूद केलं. त्यांनी आज नागपुरात महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची भेट घेत मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. ते म्हणाले, “नागपूरमधील सतरंजीपुरा परिसर सील करण्यात आला आहे. तेथून बाहेर येण्याची आणि आत जाण्याची कुणालाही परवानगी नाही. पोलीस त्या ठिकाणी चांगल्यारीतीने काम करत आहेत.”

संबंधित बातम्या :

Covid 19 | पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्याच्या बैठकीतील महत्त्वाचे 20 मुद्दे

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

राज्यात पुढील चार दिवसात विजांच्या कडकडाटासह गारांसह पावसाचा अंदाज

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, कुठे किती नवे रुग्ण?

नातू डोंबिवलीत, मुलगा आफ्रिकेत, कोकणातील वृद्धेवर गावकऱ्यांकडून अंत्यसंस्कार, अस्थी विसर्जन आणि केशार्पणही

Anil Deshmukh on Lockdown amid Corona