मुख्यमंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्राविषयी आकस असल्यानेच महापुराकडे दुर्लक्ष : पृथ्वीराज चव्हाण

| Updated on: Aug 12, 2019 | 10:16 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पश्चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आकसाचा आहे. त्यामुळेच सरकारने महापुराकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्र्यांना पश्चिम महाराष्ट्राविषयी आकस असल्यानेच महापुराकडे दुर्लक्ष : पृथ्वीराज चव्हाण
Follow us on

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पश्चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आकसाचा आहे. त्यामुळेच सरकारने महापुराकडे दुर्लक्ष केल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते कराड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “फडणवीस सरकारचा पश्चिम महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टीकोन आकसाचा आहे. त्यामुळेच महापुराकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहायला मिळाले.” हीच घटना नागपूरला घडली असती, तर मंत्री भाषणं देत फिरले असते का? असा सवालही त्यांनी विचारला.  पश्चिम महाराष्ट्र म्हणजे तेथे काही लक्ष द्यायची गरज नाही, हा दृष्टीकोन चुकीचा आहे. त्यामुळे सरकारने थोडं गांभीर्याने या परिस्थितीकडे पाहायला हवं, असंही चव्हाण यांनी नमूद केलं.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील महापुरात आतापर्यंत एकूण 40 नागरिकांचा जीव गेल्याची अधिकृत माहिती पुणे विभागीय आयुक्तांनी दिली आहे. मृतांमध्ये सांगलीतील 19, कोल्हापूरमधील 6, सातारामधील 7 आणि पुण्यातील 7 जणांचा समावेश आहे.

सांगली बोट दुर्घटनेतील 17 जणांचा समावेश आहे. आधी या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याचे आणि 6 जण बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नव्याने 5 मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा 17 झाला आहे. तसेच एक बेपत्ता व्यक्ती जीवंत सापडला आहे. कोल्हापुरात अद्यापही एक व्यक्ती बेपत्ता आहे.

स्थलांतरित नागरिकांची आकडेवारी

पूरग्रस्त भागातून एकूण 4 लाख 41 हजार 845 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. यात सांगलीतील 1 लाख 58 हजार 970, कोल्हापूरमधील 2 लाख 45 हजार 229, सातारामधील 10 हजार 486, सोलापूरमधील 26 हजार 999 नागरिकांचा समावेश आहे.