पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप, भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळले
पाकिस्तानने भारताचा पाकिस्तानमधील काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर भारताने पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
नवी दिल्ली : पाकिस्तानने भारताचा पाकिस्तानमधील काही दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर भारताने पाकिस्तानचे हे सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच संबंधित आरोप हे काल्पनिक असल्याचा स्पष्ट केलं. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले, “पाकिस्तान कडून मुद्दाम जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या या आरोपांवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय समुहाला पाकिस्तानच्या या सवयींशी परिचित आहे. याशिवाय पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणाऱ्या प्रोत्साहनाला त्यांच्याच नेत्यांनी कबुल केलं आहे.” (India denies Pakistan charge of terrorism fabricated)
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी पाकिस्तानच्या सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांच्यासोबत एक पत्रकार परिषद घेतील होती. यावेळी त्यांनी पाकिस्तानमधील काही दहशतवादी हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला. भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते श्रीवास्तव यांनी हा भारतविरोधी दुष्प्रचाराचा एक व्यर्थ प्रयत्न असल्याचं म्हटलं. तसेच भारताविरोधात पुरावे असल्याचा पाकिस्तानचा दावा खोटा आणि काल्पनिक आहे, असंही सांगितलं.
पाकिस्तान देशांतर्गत सुरु असलेलं राजकारण आणि अर्थव्यवस्थेबाबतचं आपलं अपयश लपवण्यासाठी , सीमेवरील शस्त्रसंधी उल्लंघन आणि दहशतवादाला योग्य ठरवण्यासाठी असे प्रयत्न करत असल्याचंही भारताने म्हटलं.
श्रीवास्तव म्हणाले, “जागतिक स्तरावरील दहशतवादाची ओळख असलेला ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये सापडला. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी त्याला संसदेत ‘शहीद’ म्हणून कौतुक केलं होतं. त्यांनी पाकिस्तानमध्ये 40,000 दहशतवादी असल्याचं कबुल केलं होतं. पुलवामा दहशतवादी हल्ला पाकिस्तानचं मोठं यश असल्याचंही सांगण्यात आलं. यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते.”
जगभरातील वेगवेगळ्या भागातील दहशतवादी हल्ल्यांचे संबंध पाकिस्तानशी निघाले आहेत. तसेच अशा काल्पनिक आरोप आणि पुराव्यांचे दावे करुन पाकिस्तान दहशतवादाच्या आरोपाखालून सुटणार नाही. त्यासाठी जग त्यांना नक्कीच जबाबदार धरेल.
संबंधित बातम्या :
बदला घेतला! भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केल्या पाकिस्तानी चौक्या, पाहा तुफानी हल्ल्याचा VIDEO
POK भारताचा भाग होता, आहे आणि राहील; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला ठणकावले
संबंधित व्हिडीओ :
India denies Pakistan charge of terrorism fabricated