भारताचं पाकिस्तानला चोख उत्तर, लष्कराकडून 4 दहशतवादी तळ उद्ध्वस्त

भारताने पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे जोरदार प्रत्युत्तर दिलं. याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर देत पाकच्या हद्दीत असलेली अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त (Indian Army attack on Pakistan) केले.

भारताचं पाकिस्तानला चोख उत्तर, लष्कराकडून 4 दहशतवादी तळ उद्ध्वस्त
| Updated on: Oct 20, 2019 | 1:57 PM

काश्मीर : भारताने पाकिस्तानच्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचे जोरदार प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी सैन्याने सकाळी जम्मू काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. पाकिस्तानकडून होणाऱ्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आलं. यादरम्यान दोन भारतीय जवान शहीद झाले. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. यावेळी भारताने पाकच्या सीमेलगत हद्दीत असलेले अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त (Indian Army attack on Pakistan) केले.

रविवारी (20 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लघंन करत गोळीबार सुरु केला. याला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देताना भारताचे दोन जवान शहीद झाले असून एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला.

पाकिस्तानच्या गोळीबारात एक घर आणि तांदळाचे गोडाऊन जमीनदोस्त झाले आहे. तसेच दोन गाई आणि 20 ते 25 शेळ्या-मेंढ्या मृत्यू झाला. पाकिस्तानच्या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे.

पाकिस्तानच्या या गोळीबारानंतर घुसखोरीच्या तयारीत असताना भारतीय लष्कराने दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला चढवला. त्यावेळी दहशतवादी तळं उद्ध्वस्त करण्यासाठी उखळी तोफांचा वापर करण्यात आला. यात अनेक दहशतवादी तळ नष्ट करण्यात लष्कराला यश मिळालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराला 4 दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. यात पाकिस्तानचे 4 ते 5 दहशतवादीही मारल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने दिली आहे. तर काही जखमी झाले होते. काश्मीरमधील नीलम खोऱ्यात भारतीय सैन्याने ही कारवाई (Indian Army attack on Pakistan) केली.

दरम्यान, दुसरीकडे पाकिस्तानी सैन्याने 9 भारतीय जवानांना शहीद केल्याचे म्हटलं आहे. तसेच या गोळीबार 1 पाकिस्तानी सैनिक आणि 3 स्थानिक नागरिक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात आणि भारतात घातपात घडवून आणण्याचे अनेक प्रयत्न पाकिस्तानकडून सुरु आहेत. गेल्या महिन्यात गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता.