बळीराजाला दिलासा, यंदा चांगले पर्जन्यमान, जून ते सप्टेंबर सरासरीच्या 102% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा (दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 103%) अंदाज आहे. शेतीसाठी हा पाऊस महत्वाचा असतो. (Indian Meterological Department on Monsoon Rain and Cyclone)

बळीराजाला दिलासा, यंदा चांगले पर्जन्यमान, जून ते सप्टेंबर सरासरीच्या 102% पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
| Updated on: Jun 01, 2020 | 4:57 PM

नवी दिल्ली : पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. 1 जून ते 30 सप्टेंबर या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 102% (म्हणजे 88 सेंटीमीटर) पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून मोसमी पर्जन्यासाठी विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळच्या बहुतांश भागात मोसमी पाऊस पसरला, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने पत्रकार परिषदेत दिली. (Indian Meterological Department on Monsoon Rain and Cyclone)

जोरदार नैऋत्य वारे, समुद्रसपाटीपासून किमान 4 -5 किलोमीटर वर बाष्पयुक्त ढगांचे आच्छादन या मान्सून सक्रिय होण्यासाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता झाली आहे. त्यामुळे केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याचे आम्ही घोषित करतो, असे भारतीय हवामान विभागाचे महासंचालक म्हणाले.

1 जून ते 30 सप्टेंबर या काळात भारतात दीर्घकालीन सरासरीच्या 102% (म्हणजे 88 सेंटीमीटर) पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हवामानाची काही प्रतिमाने शीत ENSO- El Nino- Southern Oscillation चे अस्तित्व सूचित करतात. तर काही प्रतिमाने, विशेषतः मान्सूनच्या दुसऱ्या भागात, कमजोर ला-निना परिस्थिती सूचित करतात. यामुळे भारताला जून ते सप्टेंबर दरम्यान मोसमी पाऊस मिळण्यास मदत होऊ शकते, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

जुलै महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा (दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 103%) अंदाज आहे. शेतीसाठी हा पाऊस महत्वाचा असतो. तर ऑगस्ट महिन्यात दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या 97% पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मोसमी पावसाचा क्षेत्रनिहाय अंदाज पाहता पावसाचे क्षेत्रीय वितरण चांगले असणार आहे.

वायव्य भारत 107%
उत्तर मध्य भारत 103%
दक्षिण द्वीपकल्प 102%
ईशान्य भारत 96%

यंदा पावसाळ्यात उत्तम पाऊस पडेल, अशी माहिती भूविज्ञान मंत्रालयाच्या सचिवांनी दिली.

पावसाची तूट – 5% (खूप कमी शक्यता, अतिशय चांगली बातमी)
सरासरीपेक्षा कमी – 15%
सरासरी पर्जन्यमान – 41%
सरासरीपेक्षा अधिक- 25%
अतिवृष्टी – 14%

महाराष्ट्र किनाऱ्यावर चक्रीवादळाचा इशारा

अरबी समुद्राच्या पूर्व-मध्य आणि लगतच्या भागातील कमी दाबाच्या पट्ट्याचे केंद्र आज (एक जून) दुपारी मुंबईच्या दक्षिण-नैऋत्य दिशेस 690 किलोमीटरवर होते. त्याचे रुपांतर आज रात्री अधिक सखोल कमी दाबाच्या पट्ट्यात व उद्या चक्रीवादळात होईल. हे चक्रीवादळ महाराष्ट्र आणि लगतच्या दक्षिण गुजरातच्या किनाऱ्यावर 3 जूनपर्यंत पोहोचेल, असा इशारा देण्यात आला.

हेही वाचा : Monsoon | मान्सून केरळात दाखल, 2 ते 4 जूनदरम्यान पाऊस मुंबईत बरसणार

हे चक्रीवादळ, 90-105 किलोमीटर प्रतितास या वेगाने 3 जूनला, तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप, गुजरात किनारपट्टीच्या मच्छिमारांना, येत्या 4 जूनपर्यंत समुद्रात न जाण्याची सूचना देण्यात आली आहे

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई व पालघरमध्ये 2 व 3 जूनला, विशेषतः 3 तारखेला, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली. याखेरीज, तुरळक ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

सखल भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः शहर आणि उपनगरात वादळी वाऱ्यामुळे इमारतींना हानी पोहोचू शकते. चक्रीवादळाचा इशारा दिला जाईल तेव्हा नुकसानीचे सविस्तर मूल्यमापन केले जाईल, असं हवामान खात्याने सांगितलं. (Indian Meterological Department on Monsoon Rain and Cyclone)