आंतरराष्ट्रीय कोर्टात जाण्यापूर्वीच पाकिस्तानच्या वकिलाने गुडघे टेकले

| Updated on: Sep 03, 2019 | 4:34 PM

काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं जगभराने मान्य केल्यानंतरही पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर पडावं लागलंय. खुद्द पाकिस्तानच्या वकिलानेच हा मुद्दा कमकुवत (Pakistan in ICJ) असल्याचं मान्य केलंय.

आंतरराष्ट्रीय कोर्टात जाण्यापूर्वीच पाकिस्तानच्या वकिलाने गुडघे टेकले
Follow us on

हेग, नेदरलँड : भारताने जम्मू काश्मीरमधील कलम 370 काढल्यापासून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहे. एकाही देशाने दाद न दिल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कोर्टात (आयसीजे) (Pakistan in ICJ) जाण्याचा निर्णय घेतला. काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं जगभराने मान्य केल्यानंतरही पाकिस्तानला पुन्हा एकदा तोंडावर पडावं लागलंय. खुद्द पाकिस्तानच्या वकिलानेच हा मुद्दा कमकुवत (Pakistan in ICJ) असल्याचं मान्य केलंय.

जम्मू काश्मीरमध्ये कथित नरसंहार होत असेल तर त्याचे पुरावे मिळवणं सध्या अत्यंत कठीण आहे, असं पाकिस्तानचे आयसीजेमधील वकील खावर कुरैशी यांनी म्हटलंय. हाती पुरावेच नसतील तर आयसीजेमध्ये काश्मीर प्रश्न आणणं पाकिस्तानसाठी सोपं नसेल, असंही त्यांनी मान्य केलं.

यापूर्वी पाकिस्तानने चीनच्या मदतीने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये (यूएनएससी) काश्मीरचा मुद्दा मांडला. पण यूएनएससीने पाकिस्तानचा नाद मिटवल्याप्रमाणे केवळ अनौपचारिक बैठक घेतली, ज्याची चर्चा बंद दाराआड झाली. या बैठकीला भारत किंवा पाकिस्तान या देशांचा प्रतिनिधीही उपस्थित नव्हता. विशेष म्हणजे चीन वगळता बैठकीतील सर्व देशांनी काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं मान्य केलं.

पाकिस्तानचे आतापर्यंतचे अयशस्वी प्रयत्न

काश्मीरविषयी केंद्र सरकारने निर्णय घेतल्याप्रमाणे पाकिस्तानचा तिळपापड झालाय. जनतेचा दबाव निर्माण होत असल्याने पाकिस्तानचे पंतप्रधान कधी अणुयुद्धाची धमकी देतात, तर कधी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतात. पण स्वतःच्या जनतेला खुश करता येईल, अशी एकही कामगिरी त्यांना करता आली नाही.

काश्मीरच्या निर्णयानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरैशी यांनी बीजिंग गाठलं आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा केली. चीनची पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असल्याने या दोन्ही देशांची मैत्री सध्या दिसून येत आहे. भारतानेही चीनशी चर्चा केली आणि हा अंतर्गत प्रश्न असल्याचं सांगितलं. चीनने पाकिस्तानच्या समाधानासाठी यूएनएससीमध्ये हा मुद्दा नेला, जिथे दोन्ही देशांना भारताविरोधात कोणताही निर्णय घेण्यात अपयश आलं.

भारताविरोधात पाकिस्तानने अमेरिकेशी संपर्क करुन तडजोड करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इम्रान खान यांनी फोन करुन भारतावर आरोप केले. पण ट्रम्प यांनी हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचं मान्य केलं आणि इम्रान खान यांनाच सबुरीने घेण्याचा सल्ला झाला. यानंतर काही दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली बैठक पाहून इम्रान खानला संताप अनावर झाला.