जयप्रभा स्टुडिओच्या विभाजनासाठी लतादीदींचा प्रस्ताव, कोल्हापूरकरांमध्ये संताप

| Updated on: Jan 29, 2020 | 9:29 PM

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीचा असेलला जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरच्या अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे या स्टुडिओच्या विभाजनाचा प्रस्ताव कोल्हापूर महानगरपालिकेने मान्य करु नये, असं कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे.

जयप्रभा स्टुडिओच्या विभाजनासाठी लतादीदींचा प्रस्ताव, कोल्हापूरकरांमध्ये संताप
Follow us on

कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या विभाजनाचा प्रस्ताव कोल्हापूर महानगरपालिकेकडे सादर करण्यात आला. त्याची कारवाई सुरु असून सध्या हा प्रस्ताव आयुक्तांच्या विचारधीन आहे. त्यामुळे कोल्हापूरकर चांगलेच संतापले आहेत (Jayprabha Studio Split Proposal). गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या मालकीचा असेलला जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरच्या अस्मितेचा विषय आहे, त्यामुळे या स्टुडिओच्या विभाजनाचा प्रस्ताव कोल्हापूर महानगरपालिकेने मान्य करु नये, असं कोल्हापूरकरांचं म्हणणं आहे (Jayprabha Studio Split Proposal).

जयप्रभा स्टुडिओ हा लता मंगेशकर यांच्या मालकीचा आहे. या स्टुडिओ परिसरातील जागा विकासाला देता यावी यासाठी या जागेच्या विभाजनाचा प्रस्ताव कोल्हापूर महानगर पालिकेकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार, स्टुडिओची मूळ वास्तू आहे तशी ठेवून मोकळी जागा विकासाला द्यावी, असं वटमुखत्यारपत्र लता मंगेशकर यांनी मेजर यादव यांना दिलं.

जयप्रभा स्टुडिओ आणि परिसराचा ऐतिहासिक वास्तूमध्ये समावेश होतो. त्यामुळे हेरिटेज समितीने मूळ वास्तूच्या संवर्धनाबाबत काय पावले उचलली जाणार आहेत. याचा आराखडा सादर करा, अशी अट घातली आहे. पण, अद्याप कोणताही आराखडा वटमुखत्यारपत्र मेजर यादव यांच्याकडून सादर करण्यात आलेला नाही.

जयप्रभा स्टुडिओचं अस्तित्व अबाधित राहावं, यासाठी कोल्हापूरकरांनी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा केला आहे. स्टुडिओची मालकी लतादीदींची असली तरी जयप्रभा स्टुडिओ हा कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेने विभाजनाचा प्रस्ताव मान्य करु नये, न करता जयप्रभा स्टुडिओच्या परिसरात असलेल्या जागेच्या मोबदल्यात वटमुक्त्यारादाराला वेगळी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका सुरेखा यांनी केली आहे.

छत्रपती राजाराम महाराजांनी भालजी पेंढारकर यांना चित्रपट निर्मितीसाठीची अट घालून मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओ सुपूर्द केला होता. भालजींनी आर्थिक अडचणीमुळे हा स्टुडिओ गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना विकला. पुढे स्टुडिओची वाताहत झाली आणि तो बंद पडला. बाहेर चित्रीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या मोकळा परिसराची विक्री होऊन त्या परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. जयप्रभा स्टुडिओच्या इमारती पाडून तिथे विकास करण्यासाठीची पावले उचललेली गेल्यानंतर 2012 मध्ये याविरोधात कोल्हापुरात मोठे जनआंदोलन उभ राहिलं. परिणामी कोल्हापूर महानगरपालिकेने जयप्रभा स्टुडिओची वास्तू संरक्षित करण्यासाठी हेरिटेज वास्तूंच्या यादीत त्याचा समावेश केला.

दरम्यान, उच्च न्यायालयाने देखील ही वास्तू जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिला. याविरोधात लता मंगेशकर यांनी उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल केली. पण नंतर मात्र ही याचिका मागे घेतली. सध्या जयप्रभा स्टुडिओच्या इमारती आणि भोवतालचा परिसर असे मिळून सव्वा तीन एकर जागा आहे. ही सर्व जागा चित्रपट व्यवसायासाठीचं आरक्षण टाकण्याचा ठराव कोल्हापूर महानगरपालिकेच्या महासभेत मंजूर करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी केली का, असा प्रश्न वारंवार चित्रपट प्रेमींकडून विचारला जातो आहे. हाच प्रश्न कोल्हापूर महानगरपालिकेला कोल्हापूर महानगरपालिकेच्या नगरसेविका सुरेखा शहा यांनी माहितीच्या अधिकारात विचारला आणि त्यानंतर जयप्रभा स्टुडिओच्या जागेवरील भूखंड विभाजनाचा प्रस्ताव असल्याची गोष्ट उघड झाली. विभाजनाची माहिती बाहेर आल्यानंतर कोल्हापूरकर पुन्हा एकदा संतापले आहेत.