
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजप-शिवसेना जोरदार प्रचार करत आहे. अनेक नवी आश्वसने दिली जात आहेत. मात्र, नागरिकही निवडणुकीचा काळ लक्षात घेता आपल्या परिसरातील प्रश्न मांडताना दिसत आहेत.

असाच एक प्रश्न सध्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शेकापूरचे नागरिक मांडत आहेत. शेकापूर गावाला जाणाऱ्या रस्त्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. रस्त्यावर काही ठिकाणी अक्षरशः पाणी साचून तळ्याचं स्वरूप आलं आहे.

ग्रामस्थ मागील कित्येक वर्षांपासून डांबरीकरणाची मागणी करत आहेत. पण कुणीही लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. भाजपने सलग दुसऱ्यांदा तिकीट दिलेले आमदार भीमराव धोंडे मतदारसंघात प्रचंड विकास झाल्याचा दावा करत आहेत.

मात्र, शेकापूर गावचा रस्ता वर्षानुवर्षे असाच राहिल्याने येथील नागरिक विकास नेमका कुठे झाला असा सवाल करत आहेत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. शेकापूर ग्रामपंचायतने लोकसभेला खासदार प्रितम मुंढेंना 90% मतदान केले. तरीही शेकापूरच्या रस्त्याची दुरावस्था आहे, असं मत गावकऱ्यांनी व्यक्त केलं आहे.

शेकापूर ग्रामपंचायत महाराष्ट्राच्या नकाशात आणि तुमच्याच मतदारसंघात आहे का असा सवालही नागरिक करत आहेत. मागील 5 वर्षात आमदारांनी जनतेसाठी काय केलं याचं उत्तर त्यांच्या समर्थकांनी द्यावं, असंही लोक विचारत आहेत.

विशेष म्हणजे सध्या निवडणुकांमुळे आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे आता तात्काळ शेकापूरचा रस्त्याचा प्रश्न सुटणार नाही. मात्र, किमान निवडणुकांनंतर तरी या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागावा, अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.