कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा, 5 रुपये प्रतिकिलो दर, एक लाख कांदा उत्पादक मोदींना पत्र लिहिणार

| Updated on: May 22, 2020 | 3:52 PM

कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 20 रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करावा, असे साकडे पत्रातून घातले आहे. (Lasalgaon Onion Farmers to write letters to PM Narendra Modi)

कांद्याने शेतकऱ्यांचा वांदा, 5 रुपये प्रतिकिलो दर, एक लाख कांदा उत्पादक मोदींना पत्र लिहिणार
Follow us on

लासलगाव : मोठ्या कष्टाने पिकवलेला कांदा आज उत्पादकाच्या डोळ्यातून पाणी काढताना दिसत आहे. कोरोनामुळे देशासह जागतिक बाजारपेठेत कांद्याची मागणी घटल्याने कांद्याला सरासरी 5 ते 6 रुपये प्रतिकिलो इतका दर मिळत आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादकांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. (Lasalgaon Onion Farmers to write letters to PM Narendra Modi)

या दरात नफा तर दूर, उत्पादन खर्चही भरुन निघणे मुश्किल झाले आहे. प्रतिकिलो 7 ते 8 रुपये दरानेही कांदा उत्पादकांना आजच्या बाजारभावात तोटा होतो. त्यामुळे कांदा उत्पादकांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने एक लाखाहून अधिक कांदा उत्पादक नरेंद्र मोदी यांना 22 ते 28 मे दरम्यान पोस्ट कार्डवर पत्र पाठवणार आहेत, असं अध्यक्ष भारत दिघोळे यांनी सांगितले. कांद्याच्या मागणीत वाढ न झाल्यास भविष्यात वाहतूक खर्चही निघणे मुश्किल होईल. कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने 20 रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करावा, असे साकडे पत्रातून घातले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत देशातील शेतकऱ्यांचे शेतीमालाचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली. पण कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना करणारा बळीराजा यंदा कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडला आहे. सर्वच देशांमध्ये कोरोना विषाणूचा धुमाकूळ सुरु असल्याने कांद्याची मागणी घटली आहे. त्याचा थेट फटका कांदा बाजार भावाला बसल्याने उत्पादन व वाहतूक खर्चासह 12 ते 14 रुपये प्रतिकिलोपर्यंत जाऊन पोहचला आहे.

शेतकरी स्वतः हे पत्र लिहून त्या त्या गावातील टपाल कार्यलायत पोहचते करतील. या पत्रातून कांदा उत्पादकांच्या अडचणीकडे लक्ष वेधत 20 रुपये प्रति किलो दराने कांद्याची खरेदी सुरु करावी, पावसाळा सुरु होण्यास फक्त दोनच आठवडे शिल्लक असल्याने शेतात काढून पडलेला लाखो टन कांदा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारने तात्काळ शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी करावी व कांदा उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी आता कांदा उत्पादक करु लागले आहेत.