माण विधानसभा : एक भाऊ भाजपात, दुसरा शिवसेनेत; जयकुमार गोरेंसमोर तगडं आव्हान

| Updated on: Sep 17, 2019 | 12:49 PM

माण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या जयकुमार गोरेंसमोर शिवसेनेत प्रवेश केलेले सख्खे बंधू शेखर गोरे यांचं तगडं आव्हान आहे

माण विधानसभा : एक भाऊ भाजपात, दुसरा शिवसेनेत; जयकुमार गोरेंसमोर तगडं आव्हान
Follow us on

सातारा : सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असणारे माण खटाव हे दोन तालुके कायम चर्चेत असतात ते इथल्या वर्षानुवर्षापासून चालत आलेल्या दुष्काळामुळे. केवळ दोन तालुक्यात चारा छावण्या असणारे हे देशातले एकमेवाद्वितीय असे तालुके म्हणावे लागतील. या तालुक्याचं राजकारणही कायम या दुष्काळाच्या समस्यांच्या अवतीभोवती फिरत आलं आहे. यंदा शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे सख्खे भाऊ पक्के वैरी होऊन माण विधानसभा मतदारसंघात (Man Vidhan Sabha constituency) एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.

माण मतदारसंघात काही गावं अशी आहेत ज्यांचा माढा या लोकसभा मतदारसंघात समावेश होतो. लोकसभेला माढा मतदारसंघात असणारा खटाव तालुक्यातील काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण्यांनी त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्यासाठी वापरला. त्यामुळेच या मतदारसंघातून शरद पवारांसारखे राष्ट्रीय नेते निवडून येऊनही इथली जलसंधारणाची कामं होऊ शकलेली नाहीत.

सातारा जिल्ह्यातील हा दुष्काळी तालुका याच जिल्ह्यातल्या अतिवृष्टी अनुभवणाऱ्या महाबळेश्वरपासून केवळ 50 किलोमीटरच्या हवाई अंतरात येतो. आजूबाजूच्या तालुक्यात पाण्याचे कालवे झाले मात्र हा तालुका आजही तहानलेला आहे. माणसांसह जनावरंही मेटाकुटीला आली आहेत. अशा या विधानसभा मतदारसंघाचे गेल्या दोन टर्मपासून काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांनी इथलं जनमत आपल्या बाजूला ठेवण्यात यश मिळवलं आहे.

2014 मधील विधानसभेच्या निवडणुकीत (Man Vidhan Sabha constituency) आमदार जयकुमार गोरे आणि रासपमधून निवडणूक लढवलेले शेखर गोरे यांच्यात चांगलीच लढत झाली, मात्र जयकुमार गोरेंनी बाजी मारली होती. त्यावेळी जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्याशिवाय राष्ट्रवादीतून सदाशिव पोळ, शिवसेनेतून रणजित देशमुख, अपक्ष अनिल देसाई असे उमेदवार रिंगणात होते.

सख्खे भाऊ पक्के वैरी, जयकुमार विरुद्ध शेखर गोरे, ‘माऊली संवाद’ला तुफान गर्दी

यावर्षी विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांना म्हणावी तितकी सोपी लढत जाणार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पाठिंबा देत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याविरोधात काम केलं होतं. विधानसभा तोंडावर आल्याचं पाहून आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तर त्यांचे सख्खे बंधू शेखर गोरे यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केला. दोघंही विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने युतीचा फॉर्म्युला गडबडणार आहे.

शिवसेनेच्या माध्यमातून शेखर गोरेंनी जयकुमार गोरेंविरोधात आपली उमेदवारी जाहीर केल्यामुळे माण खटावचं राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजपचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केलेले माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशाला नाराजी व्यक्त केल्याने “आमचं ठरलंय” हा कोल्हापूरचा पॅटर्न माण खटाव मतदारसंघात सुरु झाला आहे. या पॅटर्नमध्ये आता भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांच्याबरोबरच रासप आणि इतर मित्रपक्ष एकत्र आले आहेत.

आमचं ठरलंय म्हणत भाजप आणि मित्रपक्षांसह स्थानिक नेते तसेच राष्ट्रवादीचे काही नेते एकत्र आले असले तरी आता शेखर गोरे यांच्या शिवसेना प्रवेशाने राजकीय समीकरणे बदलण्यास सुरूवात झाली आहे. यानंतर जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशामुळे माण खटावचे राजकीय समीकरण गडबडले आहे. शेखर गोरे हे शिवसेनेत गेल्यामुळे त्यांचं आव्हान आमदार गोरेंसाठी मोठ असणार आहे. या बरोबर ‘आमचं ठरलंय’ म्हणणाऱ्या नेते मंडळींतील एक उमेदवार निवडणुकीत उभा राहिला, तर एकूणच तिरंगी लढत मतदारसंघात पाहायला मिळेल. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातली लढत राज्याच्या पटलावर लक्षवेधी ठरेल यात शंका नाही.

माण विधानसभा 2014 निकाल

काँग्रेसचे विजयी उमेदवार जयकुमार गोरे
मिळालेली मतं – 75,707

रासपचे उमेदवार शेखर गोरे
मिळालेली मतं – 52,357