काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबतं, सोनियांच्या खास माणसाला भेटून महाराष्ट्रातील रणनीती ठरली?

| Updated on: Nov 01, 2019 | 4:25 PM

भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाच्या भांडणात काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे.

काँग्रेस नेत्यांची दिल्लीत खलबतं, सोनियांच्या खास माणसाला भेटून महाराष्ट्रातील रणनीती ठरली?
Follow us on

नवी दिल्ली: भाजप-शिवसेनेतील सत्तावाटपाच्या भांडणात काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका काय याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहे. निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधीपक्षात बसण्याची भाषा बोलली गेली असली तरी आता दोन्ही काँग्रेस यानिमित्ताने भाजपला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याचाच भाग म्हणून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह (Maharashtra Congress Leader in Delhi) काही नेत्यांनी दिल्लीत पक्षाचे वरिष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल यांची भेट घेतली.

वेणुगोपाल यांच्या भेटीबाबत (Maharashtra Congress Leader in Delhi) बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “या भेटीत आम्ही त्यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीतील आमच्या कामाविषयी माहिती दिली. सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार आम्ही वेणुगोपाल यांची भेट घेतली. आम्हाला विस्तृत चर्चा करायची असल्याने सोनिया गांधी यांनी आम्हाला वेणुगोपाल यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले.”

महाराष्ट्राच्या परिस्थितीवर आमची नजर आहे आणि सध्या “वेट अँड वॉच” ही परिस्थिती असल्याचं देखील थोरात यांनी यावेळी नमूद केलं.

या बैठकीला उपस्थित माणिकराव ठाकरे म्हणाले, “आज महाराष्ट्रात जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार आहे. सध्या आमचं काहीही ठरलेलं नाही.” आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा जनाधार मिळालेला आहे. त्यामुळे सध्या काँग्रेसचा मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. तर अशोक चव्हाण यांनी शिवसेनेसोबत जाण्याची सध्या चर्चा नसल्याचं म्हणतानाच राजकारणात अनेक शक्यता असतात. त्यामुळे वाट बघणे हेच योग्य असल्याचं सूचक वक्तव्य केलं.