चिपळूणजवळ आणखी एका धरणाला गळती, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

| Updated on: Jul 08, 2019 | 8:28 PM

तिवरे धरण फुटून आठवडाही झाला नाही, त्यातच मारवणे धरणामुळे ग्रामस्थांची भीती आणखी वाढली आहे. जीवाच्या सुरक्षेसाठी भयभीत ग्रामस्थांकडून पहारा दिला जातोय.

चिपळूणजवळ आणखी एका धरणाला गळती, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण
Follow us on

रत्नागिरी : महाराष्ट्रातील धरणं खरंच सुरक्षित आहेत का, असा हा प्रश्न पुन्हा उपस्थित होतोय. कारण, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळुणातील तिवरे धरणापाठोपाठ मोरवणे धरणालाही गळती लागली आहे. तिवरे धरण फुटून आठवडाही झाला नाही, त्यातच मारवणे धरणामुळे ग्रामस्थांची भीती आणखी वाढली आहे. जीवाच्या सुरक्षेसाठी भयभीत ग्रामस्थांकडून पहारा दिला जातोय.

संततधार पावसामुळे मोरवणे धरण भरलं आहे. विशेष म्हणजे तिवरे धरणापेक्षा तिप्पट क्षमतेचं हे धरण आहे. 2000 साली पाटबंधारे खात्याने धरण बांधलं होतं. पण फक्त 19 वर्षातच धरणाला गळती लागली आहे. धरणातील पाणी सांडव्यावरून वाहू लागल्याने धोका आणखी वाढलाय. तिवरे धरण दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग आली आहे. सकाळपासूनच अधिकाऱ्यांनीही धरणाची पाहणी करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

जालना जिल्ह्यात धामणा धरणाची परिस्थिती

भोकरदन तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने भोकरदन तालुक्यातील धामणा प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढली आहे. धामणा धरणाच्या सांडव्याला मोठे तडे गेल्याने धामणा धरणाच्या भिंतीतून पाणी वाहू लागलंय. भिंतीला तडे गेल्यामुळे धरण फुटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. धरण क्षेत्रातील सांडव्यामध्येच 2 दशलक्ष घनमीटर पाणी साठा आहे. जिल्हा प्रशासनाकडून या धरणावर सातत्याने लक्ष ठेवलं जातंय.

रायगड जिल्ह्यातील धरणाला गळती

रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाच्या सांडव्याच्या भिंतीचे दगड निखळल्याने सांडवा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील हे धरण 1980 मध्ये बांधण्यात आलं होतं. धरणाची दुरूस्‍ती करावी अशी मागणी ग्रामस्‍थांनी केली आणि त्यासाठी सातत्‍याने पत्रव्यवहार केला. पावसाळयात सांडव्‍याची भिंत कोसळून दुर्घटना झाली तर खालील बाजूस असलेल्‍या 10 ते 12 गावांना धोका होऊ शकतो.

संबंधित बातम्या :

जालना जिल्ह्यातलं धरण फुटण्याची भीती, गावकऱ्यांचं स्थलांतर, NDRF अलर्टवर

शाहू महाराजांनी बांधलेलं राधानगरी धरण, 100 वर्षांनंतरही ना गळती, ना धोका