Bihar Exit Poll 2020 : ‘या त्रिसूत्रीने बिहार निवडणुकीचे गणित बदलले?, नितीशकुमारांचं भावनिक कार्डही चाललं नाही?; एक्झिटपोलचा अंदाज

| Updated on: Nov 07, 2020 | 9:24 PM

बिहारच्या निवडणुकीत यंदा विकास, बेरोजगारी आणि महागाई या त्रिसूत्रीचा अधिकच जोर राहिला. शिवाय बिहारी जनतेने या तीन मुद्द्यांवरच मतदान केल्याने बिहारमध्ये सत्तांतर होणार असल्याची शक्यता एक्झिटपोलमधून व्यक्त होत आहे.

Bihar Exit Poll 2020 : या त्रिसूत्रीने बिहार निवडणुकीचे गणित बदलले?, नितीशकुमारांचं भावनिक कार्डही चाललं नाही?; एक्झिटपोलचा अंदाज
Follow us on

बिहार: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तीनही टप्प्याचं मतदान पूर्ण झालं आहे. त्यानंतर आलेल्या एक्झिटपोलनुसार बिहारमध्ये सत्तांतर होण्याची दाट शक्यता आहे. बिहारच्या निवडणुकीत यंदा विकास, बेरोजगारी आणि महागाई या त्रिसूत्रीचा अधिकच जोर राहिला. शिवाय बिहारी जनतेने या तीन मुद्द्यांवरच मतदान केल्याने बिहारमध्ये सत्तांतर होणार असल्याची शक्यता एक्झिटपोलमधून व्यक्त होत आहे. (modi, nitish, tejashwi and bihar election)

येत्या 10 नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. मात्र, त्याआधीच बिहारमध्ये सत्तांतर होत असल्याचं एक्झिटपोलच्या अंदाजातून स्पष्ट होत आहे. बिहारच्या निवडणुकीत यंदा विकासाचा मुद्दा नंबरवनला राहिला. सुमारे 42 टक्के लोकांनी विकासाच्या मुद्द्यावरच मतदान केल्याचं दिसून आलं आहे. तर 30 टक्के लोकांनी बेरोजगारीच्या मुद्द्यावर मतदान केल्याचं इंडिया टुडे-अॅक्सिस-माय-इंडियाच्या सर्व्हेतून दिसून येत आहे. या सर्व्हेत 11 टक्के लोकांनी महागाईचा मुद्दा या निवडणुकीतील कळीचा मुद्दा होता असं सांगितलं. तर केवळ तीन टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावरून मतदान केलं. याच तीन टक्के लोकांनी राजकीय पक्ष पाहून मतदान केलं आहे. यावरून मोदींची लोकप्रियता घटत असून त्यांची जादू बिहारच्या निवडणुकीत चालली नसल्याचं दिसून येत आहे.

पक्ष आणि त्यांचे मुद्दे

कोरोना संकटकाळातील देशातील ही पहिली निवडणूक होती. या निवडणुकीत प्रचार रॅली, जनसभांसह व्हर्च्युअल प्रचारावरही मोठा भर देण्यात आला होता. विरोधी पक्षात असलेले राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांना रोजगारीच्या मुद्द्यावर घेरले. त्यांनी राज्यातील जनतेला 10 लाख नोकऱ्या देण्याचं आश्वासन दिलं. तेजस्वी यांच्या या आश्वासनाकडे दुर्लक्ष करायचं सोडून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तेजस्वी यांच्या या आश्वासनाची खिल्ली उडवली. एक्झिट पोलनुसार बिहारी जनतेला नितीशकुमार आणि शहा यांचं नेमकं हेच वागणं पटलेलं दिसत नाही.

तेजस्वी यांच्या या आश्वासनाला बिहारी जनतेचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचं दिसून आल्यानंतर भाजपनेही मग 19 लाख रोजगाराच्या निर्मिती करण्याचं आश्वासन द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यांचं हे आश्वासन जनतेच्या गळी उतरताना दिसत नाही.

या शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह एनडीएच्या काही नेत्यांनी लालूंच्या काळातील जंगलराजवर टीका करण्यास सुरुवात केली. गेली दहा वर्षे नितीशकुमार सत्तेत असताना दहा वर्षापूर्वीच्या लालूंच्या कारभाराचा या निवडणुकीत पंचनामा करण्यात येत होता. तेही बिहारी मतदारांना आवडलेलं दिसत नाही. त्याचाही एनडीएला मोठा फटका बसल्याचं चित्रं आहे. त्याचप्रमाणे निवडणुकीत जिंकल्यानंतर कोरोना व्हॅक्सीन मोफत देण्याचं गाजर भाजपकडून दाखवण्यात आलं. त्यावर गैर भाजप सरकारने तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. शिवाय भाजप निवडणुकांसाठी कोणतीही फेकाफेक करू शकते, असा संदेशही बिहारी जनतेत गेल्याचा फटकाही एनडीएला बसताना दिसतो आहे.

 

भावनिक कार्डही चाललं नाही

निवडणुकीच्या तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात नितीश कुमार यांनी भावनिक कार्ड खेळण्याचा प्रयत्न केला. ही माझी शेवटची विधानसभा निवडणूक आहे, असं त्यांनी सांगितलं. पण त्यालाही बिहारी जनता भुलली नसल्याचं दिसून येतं.

कोणत्या टप्प्यात किती मतदान?

  • बिहारमध्ये एकूण तीन टप्प्यात मतदान झालं.
  • 28 ऑक्टोबरला पहिल्या टप्प्यात 71 जागांसाठी मतदान झालं.
  • दुसऱ्या टप्प्यात 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी मतदान झालं.
  • तर तिसऱ्या टप्प्यात आज 7 नोव्हेंबर रोजी 78 जागांवर मतदान झालं.
  • एकूण जागा: 243
  • बहुमत : 122

(modi, nitish, tejashwi and bihar election)

संबंधित बातम्या:

Bihar Election Exit Poll : तेजस्वी तळपले, मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंती

Bihar Exit Poll 2020 : बिहारमध्ये कुणाचं सरकार? सर्व एक्झिट पोल एकाच ठिकाणी

बिहारच्या तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांचा आणि आमदारांचा पगार कापेन: तेजस्वी यादव

(modi, nitish, tejashwi and bihar election)