सिबील गेलं खड्ड्यात, अधिकार वापरुन शेतकऱ्यांना कर्ज द्या, कुंभारवाडीतून संभाजीराजेंचा बँक अधिकाऱ्यांना फोन

| Updated on: Oct 20, 2020 | 11:49 AM

सिबील वगैरे गेलं खड्ड्यात, ते काय करायचं आपण.. अशावेळी तुमचे अधिकार वापरा ना जरासे, असं म्हणत संभाजीराजे छत्रपतींनी बीडमधील बँक अधिकाऱ्यांना फोनवरुन झापलं

सिबील गेलं खड्ड्यात, अधिकार वापरुन शेतकऱ्यांना कर्ज द्या, कुंभारवाडीतून संभाजीराजेंचा बँक अधिकाऱ्यांना फोन
Follow us on

बीड : राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावरुन थेट बॅंक अधिकाऱ्यांना सुनावले. कुंभारवाडीतील ग्रामस्थांना कर्ज देण्यावरुन टोलवाटोलवी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांना संभाजीराजेंनी फोनवरुन झापले. नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी संभाजीराजे सध्या बीड जिल्ह्याच्या पाहणी दौऱ्यावर आहेत. (MP Sambhajiraje calls Bank Officer from Beed Kumbharwadi village asks to Give a loan)

काय झाला संवाद?

संभाजीराजे : मला एक तुम्ही सांगा, मी आता कुंभारवाडीत आहे, कुठेतरी ऑफिसमध्ये बसलोय, असं नाही, कुंभारवाडीत आहे. त्या सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना कर्ज देत नाही. ही अडचण आहे, ती अडचण आहे असं सांगता. सिबील खराब आहे म्हणता… (गावकऱ्यांचा आवाज – चार महिने झाले)

बँक अधिकारी : शंभरातील काही जणांचे असेल

संभाजीराजे : नाही नाही.. इथे सगळ्यांची तक्रार आहे, मी खोटं बोलत नाहीये, मी इथे समोर आहे. माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, कुंभारवाडीतील लोकांना परत पाठवतो तुमच्याकडे
(गावकऱ्यांचा आवाज – 22 गावं आहेत) त्यांच्याकडून जर व्यवस्थित रिपोर्ट आला नाही, तर मी स्वतः बँकेत येऊन बसणार

बँक अधिकारी : तुम्ही येण्याची आवश्यकता नाही

संभाजीराजे : शेवटी शेतकरी हा आपला केंद्रबिंदू आहे आणि तो अडचणीत आहे सध्या. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक द्या, तुमच्या अडचणी काय आहेत ते सांगा, पण उडवून लावू नका.

बँक अधिकारी : सरपंच येतात त्यांना सांगतो

संभाजीराजे : ठराविक लोकांना पाठवतो आणि त्याचा रिपोर्ट मला डायरेक्ट यायला पाहिजे. सिबील वगैरे गेलं खड्ड्यात, ते काय करायचं आपण.. अशावेळी तुमचे अधिकार वापरा ना जरासे. त्यांनी त्यांच्या व्यथा- दुःख मला सांगितलं. मार्ग काढा, मार्ग नाही निघाला तर मला सांगा, पण रिपोर्टिंग करा मला आज

“फडणवीसांनीही पुढाकार घायला हवा”

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे. मात्र मुख्यमंत्र्यांसह राज्यातील इतर पुढारी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण करताना दिसत आहेत. ही वेळ मदत करण्याची आहे एकमेकांवर ताशेरे ओढण्याची नाही असा सल्ला छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील पुढाऱ्यांना दिला आहे.

शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी केंद्राने देखील पुढाकार घ्यायला हवा, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान मोदींसोबत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे राज्याला मदत करण्यासाठी त्यांनीही पुढाकार घायला हवा, असंही संभाजीराजे म्हणाले. (MP Sambhajiraje calls Bank Officer from Beed Kumbharwadi village asks to Give a loan)

नुकसानीची तीव्रता मोठी असली तरी अधिकारी मात्र बांधावर न जाता कार्यालयात बसूनच पंचनामे करत असल्याची माहिती आली आहे. शासनाने यात लक्ष घातले पाहिजे अशी मागणी संभाजीराजे यांनी केली. दरम्यान राज्यात चाललेल्या राजकारण्यांवर बोलण्यास संभाजीराजे यांनी नकार दिला.

संबंधित बातम्या :

‘आमी आत्महत्या करायला तयार हाव… आवं काय, जगावं कसं बगा आमी?’, बळीराजाची व्यथा ऐकून संभाजीराजे हादरले

…तर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना सरकार जबाबदार, संभाजीराजे कडाडले

(MP Sambhajiraje calls Bank Officer from Beed Kumbharwadi village asks to Give a loan)