मुंबईहून साताऱ्याला आलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू, आई-वडील चार दिवस मुलाच्या मृतदेहासोबत राहिले

| Updated on: May 18, 2020 | 5:15 PM

सातारा जिल्ह्यातील म्हाते खुर्द गावात 15 वर्षांच्या युवकाचा मृतदेह घरात आढळल्याने जावळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. (Mumbai Boy Dies in Satara Family hides Dead body at Home for Four Days)

मुंबईहून साताऱ्याला आलेल्या युवकाचा संशयास्पद मृत्यू, आई-वडील चार दिवस मुलाच्या मृतदेहासोबत राहिले
Follow us on

सातारा : मुंबईहून साताऱ्याला आलेल्या 15 वर्षांच्या युवकाचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू झाला. त्यानंतरही चार दिवस त्याचे आई, वडील आणि भाऊ हे मृतदेहासोबत राहिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. (Mumbai Boy Dies in Satara Family hides Dead body at Home for Four Days)

सातारा जिल्ह्यातील म्हाते खुर्द गावात 15 वर्षांच्या युवकाचा मृतदेह घरात आढळल्याने जावळी तालुक्यात खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे चार दिवसांपूर्वी युवकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतरही त्याचे आई, वडील आणि भाऊ हे मृतदेहासोबत राहत होते. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्याने काल दुपारी हा सर्व प्रकार उघडकीस आला.

मुंबईतील कोरोनाचा वाढता प्रसार पाहून संबंधित पती-पत्नी 27 मार्चला म्हाते खुर्द या आपल्या मूळगावी दोन मुलांसह आले होते. गेली अनेक वर्षे ते मुंबईतच वास्तव्यास आहेत. मुंबईहून आल्यापासून या कुटुंबाने स्वत:ला घरातच कोंडून घेतले होते. 15 वर्षांचा युवक आणि त्याचा भाऊही घराबाहेर आले नव्हते. मात्र काल (रविवार 17 मे) दुपारपासून त्यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने गावातील काही ग्रामस्थांनी याची माहिती मेढा पोलीस स्टेशनला दिली.

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन युवकाच्या कुटुंबाला ताब्यात घेतले. नेमका हा काय प्रकार आहे, याचा तपास पोलीस आणि प्रशासकीय तहसीलदार करत आहेत. दुर्धर आजाराने युवकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पूर्ण कुटुंबाची ‘कोरोना’ चाचणी करावी अशी मागणी स्थानिक करत आहेत. (Mumbai Boy Dies in Satara Family hides Dead body at Home for Four Days)

हे कुटुंब मुंबईहून आल्यामुळे कोरोनाविषयीची पोलीस विशेष दक्षता बाळगत आहेत. तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अहवालानंतर समोर येईल.

तीन दिवसांपूर्वीच तरुणाचा मृत्यू झालेला असतानाही वडिलांनी कोणालाही न सांगता मृतदेह घरातच का ठेवला, याबाबत ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस प्रशासनाला मयत तरुणाच्या कुटुंबाकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याने मृत्यूचे गूढ मात्र कायम आहे.