Historical Rangotsav in Nashik | नाशिकमधील 300 वर्ष जुन्या रंगोत्सवाची चित्तरकथा; यंदा वाजत-गाजत आयोजन!

| Updated on: Mar 21, 2022 | 9:10 AM

नाशिकमध्ये रहाडीत रंग टाकून त्यांच्यात पाणी भरले जाते. रंगपंचमीदिवशी या रहाडीभोवती तरुण गोल उभे राहतात. रहाडीतल्या पाण्यात तरुण जोरदार सूर मारतात. त्याला धप्पा म्हटले जाते. तरुण पाण्यामध्ये पडतो. त्या धप्प्याने काठावर उभे असलेले सारेच रंगात न्हाऊन निघतात. रहाडीमध्ये असे सूर मारून जोरदार रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी रहाडीमध्ये उंच उडी मारण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा रंगते. जाणून घेऊ नाशिकमधील पारंपरिक रंगोत्सवाची ही आगळीवेगळी चित्तरकथा.

Historical Rangotsav in Nashik | नाशिकमधील 300 वर्ष जुन्या रंगोत्सवाची चित्तरकथा; यंदा वाजत-गाजत आयोजन!
नाशिकमधील तीनशे वर्ष जुन्या असलेल्या रहाडी.
Follow us on

नाशिकः महाराष्ट्रात अनके ठिकाणी होळीच्या दुसऱ्यादिवशी धुळवड साजरी करत रंग खेळला जातो. मात्र, नाशिक (Nashik) याला अपवाद आहे. येथे होळीनंतर पाचव्या दिवशी मोठ्या उत्साहात रहाड रंगोत्सव साजरा केला जातो. यंदा हा रंगोत्सव (Rangotsav) उद्या मंगळवारी 22 मार्च रोजी मोठ्या उत्साहात होणार आहे. नाशिकमधील 300 वर्षांची परंपरा असलेला हा ऐतिहासिक पेशवेकालीन रहाड (Rahad) रंगोत्सव राज्यभरात प्रसिद्ध आहे. रहाड म्हणजे भला मोठा भूमिगत हौद. या रंगोत्सवात शहरातील रहाडींमध्ये रंग करून मोठ्या उत्साहात सण साजरा केला जातो. जुन्या नाशिकमधील शिवाजी चौकात साती आसरा मंदिरासमोर एका पेशवेकालीन रहाडीचा शोध लागला आहे. यावर्षी ही रहाड रंगोत्सवासाठी खुली करण्यात येणार होती. मात्र, दुरुरुस्तीच्या कामाखातर ती उघडता येणार नाही. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा रंगोत्सव साजरा झाला नाही. यावर्षी तो साजरा होणार की नाही, याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, शहरातील कोरोना निर्बंध हटवल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार या ऐतिहासिक रंगोत्सवाला पोलीस आणि प्रशासनाने परवानगी दिली आहे.

उत्सवाचे वेगळेपण काय?

शहरातील जुने नाशिक गावठाणात चक्क पेशवेकाळात बांधलेल्या रहाडी म्हणजेच भूमिगत हौद आहेत. या रहाडीवरून सतत वाहतूक, रहदारी सुरू असते. मात्र, रंगोत्सवाच्या आधी या रहाडी शोधल्या जातात. त्यांची साफसफाई, स्वच्छता, डागडुजी केली जाते. त्यांची पूजा होते. या रहाडीत रंग टाकून त्यांच्यात पाणी भरले जाते. रंगपंचमीदिवशी या रहाडीभोवती तरुण गोल उभे राहतात. रहाडीतल्या पाण्यात तरुण जोरदार सूर मारतात. त्याला धप्पा म्हटले जाते. तरुण पाण्यामध्ये पडतो. त्या धप्प्याने काठावर उभे असलेले सारेच रंगात न्हाऊन निघतात. रहाडीमध्ये असे सूर मारून जोरदार रंगपंचमी साजरी केली जाते. यावेळी रहाडीमध्ये उंच उडी मारण्यासाठी तरुणांमध्ये स्पर्धा रंगते.

रंग बनवण्याची पद्धत कोणती?

रहाडीतील रंगोत्सवासाठी रंग वेगळ्या पद्धतीने बनवला जातो. त्यासाठी पाने, फुले, हळद, कुंकू हे सर्व पदार्थ एकत्र करून चार ते पाच तास एका भांड्यात गरम करून ठेवतात. तिवंधा चौकातील रहाड 12 फूट खोल आणि 10 फूट रूंद आहे. शनी चौकातील रहाड 12 फूट खोल आणि 12 फूट रूंद आहे. रंगोत्सव संपल्यानंतर बल्यांचा (सागवानी लाकडांचे मोठे ओंडके) वापर करून ही रहाड बुजवली जाते. या रगाडीत रंगाचे पाणी असते. त्यावर उसाचे चिपाड आणि माती टाकली जाते. ही रहाड पुन्हा थेट पुढल्या वर्षी रंगपंचमीसाठी खुली केली जाते.

कुठला रोग होत नाही?

नाशिकमध्ये जुनी तांबट गल्ली, तिवंधा चौक, काजीपुऱ्यातील दंडे हनुमान चौक, गाडगे महाराज पुलाखालील दिल्ली दरवाजा, पंचवटीतील शनी चौक आणि शिवाजी चौकातील साती आसरा मंदिरासमोर रहाडी आहेत. या रहाडीमध्ये रंगोत्सव खेळण्यासाठी गुलाबी रंग टाकला जातो. या रंगात अंघोळ केल्यामुळे कसलाही त्वचारोग होत नाही. उन्हाळ्यात उन्हाचा कसलाही त्रास होत नाही, असा समज आहे. त्यामुळे या रहाडीत रंग खेळण्यासाठी दरवर्षी शेकडो जणांची झुंबड उडते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा रहाडी रंगोत्सव साजरा झाला नाही. कोरोनामुळे या उत्सवावर बंद होती. तत्पूर्वी एकदा दुष्काळामुळे ही रहाड बंद होती. मात्र, यंदा तो दणक्यात साजरा केला जाणार आहे.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

tv9 Explainer : आप कौन है, भर विधानसभेत नितीशकुमारांनी सभापतींना झापलं, भाजपला झटका देण्याच्या तयारीत?

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!