21 दिवस महत्त्वाचे, अन्यथा संपूर्ण देश 21 वर्ष मागे जाईल : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आज रात्री आठ वाजता पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनची महत्त्वपूर्ण घोषणा केली (PM Narendra Modi).

21 दिवस महत्त्वाचे, अन्यथा संपूर्ण देश 21 वर्ष मागे जाईल : नरेंद्र मोदी
Chetan Patil | Updated on: Mar 24, 2020 | 9:32 PM

नवी दिल्ली : “कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी पुढचे 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. हे 21 दिवस नाही सांभाळलं तर आपला देश आणि आपण 21 वर्ष मागे जाऊ. अनेर परिवार संपतील. ही गोष्ट मी पंतप्रधान म्हणून नाही तर आपल्या परिवाराचा सदस्य म्हणून बोलत आहे. त्यामुळे बाहेर पडू नका, घरातच राहा”, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केलं. नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे आज रात्री आठ वाजता पुन्हा एकदा जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी लॉकडाऊनची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

“देशाला वाचवणं ही भारत सरकार, राज्य सरकार, प्रत्येक लोकप्रतिनिधी आणि पंतप्रधान म्हणून माझी प्राथमिकता आहे. त्यामुळे मी विनंती करतो, तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. हा लॉकडॉऊन 21 दिवसांता असेल. याचा अर्थ 3 आठवड्यांचा असेल. येणारे पुढचे 21 दिवस फार महत्त्वाचे आहेत. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी 21 दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत”, असं नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.

“गेल्या दोन दिवसात सर्व राज्यात लॉक डाऊन करण्यात आलं आहे. कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देश महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहे. आज रात्री 12 वाजेपासून संपूर्ण देशात पूर्णत: लॉकडाऊन केलं जाणार आहे. देश आणि देशातील नागरिकांना वाचवण्यासाठी संचारबंदी लागू केली जात आहे. देशातील प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, शहर, गावांमध्ये लॉकडाऊन केलं जात आहे. हा एक प्रकारचा कर्फ्यूच आहे. हे जनता कर्फ्यूच्या पुढचं पाऊल आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी हे पाऊल अत्यंत आवश्यक आहे. याची आर्थिक किंमत देशाला मोजावी लागेल”, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

“कोरोनाच्या जागतिक महामारीला तुम्ही बघत आणि ऐकत आहात. कोरोनाने मोठमोठ्या देशांना असाहाय्य केलं आहे. ते देश प्रयत्न करत नाहीत किंवा त्यांना संसाधनांची कमी आहे, असंही नाही. मात्र कोरोना इतक्या वेगाने पसरत आहे की कितीही प्रयत्न केले तरी परिस्थिती भीषण होत चालली आहे. तज्ज्ञही तेच सांगत आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी याशिवाय कोणताच पर्याय नाही. कोरोनाला रोखायचं असेल तर त्याच्या संक्रमणाची साखळी तोडावी लागेल. काही लोक या गैरसमजात आहेत की, सोशल डिस्टंन्सिंग फक्त रुग्णांसाठी आहे. मात्र, ते चूक आहे. हे प्रत्येकासाठी तितकंच महत्त्वाचं आहे. काही लोकांचे चुकीचे विचार तुम्हाला, परिवाराला आणि पुढे पूर्ण देशाला मोठ्या संकटात टाकतील. पुढे असेच चालू राहिलं तर भारताला मोठा फटका बसेल”, असंही नरेंद्र मोदींनी नमूद केलं.

संबंधित बातम्या :

भारताला वाचवण्यासाठी आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन : पंतप्रधान मोदी

भारतात लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील महत्त्वाची मुद्दे

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us