चंद्रभागेला तब्बल 13 वर्षानंतर पूर, 10 हजाराहून अधिक नागरिकांचं स्थलांतर

| Updated on: Oct 16, 2020 | 9:11 AM

उजनी, वीर धरणातून जवळपास ३ लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, तब्बल 13 वर्षानंतर चंद्रभागा नदीला पूर

चंद्रभागेला तब्बल 13 वर्षानंतर पूर, 10 हजाराहून अधिक नागरिकांचं स्थलांतर
Follow us on

पंढरपूर: विठुरायाच्या पंढरीलाही परतीच्या पावसाचा तडाखा बसलाय. पंढरपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. तर उजनी, वीर आणि नीरा धरणातून तब्बल तीन लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्यानं चंद्रभागा नदीला 13 वर्षानंतर पूर आला आहे. त्यामुळं नदी पात्रातील मंदिरं पाण्याखाली गेली आहे. तर नदीकिरानी असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं नदीकिनारच्या कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. तर पंढरपूरहून बाहेर जाणारी वाहतूक बंद करण्यात आलीय. पंढरपूरहून सातारा, पुणे, सोलापूर आणि विजापूरला जाणारे रस्तेही बंद करण्यात आले आहेत. (Chandrabhaga river floods in Pandharpur)

मुसळधार पाऊस आणि धरणातून चंद्रभागेत सोडण्यात आलेल्या पाण्यामुळं इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बाजारपेठेतील तळमजल्यांमध्ये पाणी शिरलं आहे. दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. परतीच्या पावसामुळं पंढरपूर आणि शेजारच्या गावांमधील शेतीचं आतोनात नुकसान झालंय.

चंद्रभागेच्या घाटाची भिंत कोसळून 6 जणांचा मृत्यू

शहरातील चंद्रभागा नदीकडेला नव्याने बांधण्यात येत असलेल्या कुंभार घाटाची भिंत कोसळली. घाटाच्या भिंतीच्या आडोशाला उभ्या असलेल्या आठ जणांपैकी सहा जणांचा ढिगाऱ्याखाली अडकून मृत्यू झाला आहे. मंगेश गोपाळ अभंगराव(वय 35), राधाबाई गोपाळ (वय 50), पिलू उमेश जगताप (वय 13), गोपाळ लक्ष्मण अभंगराव (वय 70), आणि दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला आहे. दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी दिली. दरम्यान या दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

सोलापूर जिल्ह्यात पावसाचा कहर

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात सोलापूर जिल्ह्यातील हजारो एकर शेती उद्ध्वस्त झाली आहे. अनेक घरांमध्ये पाणी शिरल आहे. अनेक घरांची पडझड झालीय. त्यामुळं अनेकांचा संसार उघड्यावर आलाय. परतीच्या पावसााचा सर्वाधिक फटका बार्शी तालुक्यात बसलाय. शहरातील मुख्य बाजारपेठेत तीन फूट पाणी साचलं होतं. तर झोपडपट्टीत पाणी शिरल्यानं अनेकांवर आसरा शोधण्याची वेळ आली होती.

संबंधित बातम्या:

पंढरपूरच्या दुर्घटनेस जबाबदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

विठुरायाच्या पंढरीलाही पुराचा वेढा!, सहा हजार नागरिकांचं स्थलांतर होणार

Chandrabhaga river floods in Pandharpur