तोंडावर ‘गमछा’ बांधून संबोधन सुरु, कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘सप्तपदी’

| Updated on: Apr 14, 2020 | 11:45 AM

भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, असं म्हणत मोदींनी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली. (PM Narendra Modi Seven Tips during Lockdown)

तोंडावर गमछा बांधून संबोधन सुरु, कोरोना रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सप्तपदी
Follow us on

नवी दिल्ली : ‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावमुळे भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनमध्ये 19 दिवसांची वाढ केली. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस होता. यावेळी पंतप्रधानांनी लॉकडाऊनमध्ये पाळलेल्या संयमाबद्दल देशवासियांचे आभार मानले. ‘कोरोना’ रोखण्यासाठी नरेंद्र मोदींनी सप्तपदी सांगितली. सात गोष्टींसाठी साथ द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं. तोंडावर ‘गमछा’ अर्थात पंचा बांधून मोदींनी भाषणाला सुरुवात केली होती. (PM Narendra Modi Seven Tips during Lockdown)

कोरोना रोखण्यासाठी मोदींची सप्तपदी

1. घरातील ज्येष्ठांची, विशेषत: ज्यांना जुना आजार आहे त्यांची जास्त काळजी घ्या
2. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मणरेषा पाळा, घरगुती मास्क नक्वी वापरा
3. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या निर्देशांचे पालन करा. गरम पाणी, काढा प्या.
4. ‘कोरोना’चा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करा, इतरांनाही प्रेरीत करा
5. शक्य तेवढ्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या, भोजनाची व्यवस्था करा
6. आपल्या व्यवसायातील कर्मचाऱ्यांची काळजी घ्या. कुणालाही नोकरीवरुन काढू नका.
7. आपले  डॉक्टर, नर्स आरोग्यरक्षक, सफाई कर्मचारी यांचा मान राखा, गौरव करा

हेही वाचा : PM Modi Live : संपूर्ण देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन, मोदींची मोठी घोषणा

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

  • अनेक कष्ट सोसून तुम्ही संकटाशी दोन हात करत आहेत, तुम्हाला सलाम, तुमच्या त्यागामुळेच भारत कोरोनाशी लढत आहे, एखाद्या सैनिकाप्रमाणे कर्तव्य निभावत आहात
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला नागरिकांनी संयम दाखवत खरी श्रद्धांजली दिली
  • अन्य देशांच्या तुलनेत भारताने कसा कोरोना संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला, याचे तुम्ही सहभागी आणि साक्षीदार आहात
  • भारतात कोरोना केस सापडण्याआधीच आपण परदेशी नागरिकांचे स्क्रीनिंग सुरु केले, शंभर केस होण्याआधीच परदेशी सीमा बंद केल्या, समस्या वाढण्याची वेळ पाहिली नाही, समस्या दिसताच ती थांबवण्याचा निर्णय घेतला
  • इतर देशांशी तुलना करण्याची वेळ नाही, पण आपली स्थिती जगातील महासत्तांच्या तुलनेत आटोक्यात आहे
  • भारताने वेगवान निर्णय घेतले नसते, तर काय स्थिती असती, याची कल्पना करूनही अंगावर शहारे येतात, लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचा मोठा लाभ, याची मोठी आर्थिक किंमत मोजावी लागली, पण जीवापुढे याचं मोल नाही
  • राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था यांचं मोलाचं कार्य, कोरोना ज्या वेगाने वाढत आहे, त्याने आर्थिक तज्ज्ञही अवाक, लॉकडाऊन वाढवण्यात यावा हा उपाय वारंवार समोर येत आहे
  • भारतातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढवण्यात येत आहे 
  • पुढच्या काळात शिस्तीने वागणं आवश्यक आहे, अधिक सतर्कता बाळगायला हवी, कठोर पावलं उचलावी लागतील, नवीन हॉटस्पॉट तयार होऊ न देणं महत्त्वाचं
  • 20 एप्रिलपर्यंत बारकाईने प्रत्येक राज्य, जिल्हे, शहर यांचं मूल्यांकन, जे क्षेत्र आपलं हॉटस्पॉट वाढू देणार नाहीत, तिथे काही आवश्यक गोष्टींना सूट किंवा सशर्त अनुमती देण्याचा विचार करू
  • सरकार उद्या विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार
  • पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून हातावर पोट असलेल्या गरीब मजुरांसाठी विशेष प्रयत्न
  • कोरोनाचे 10 हजार रुग्ण झाल्यावर 1500-1600 बेड्स असावे, असा जागतिक अनुभव, आपल्याकडे 2 लाख बेड्स आणि 600 कोविड रुग्णालये
  • युवा वैज्ञानिकांनो पुढे या, कोरोनावर लस शोधा(PM Narendra Modi Seven Tips during Lockdown)