कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची साठा मर्यादा चारपट वाढवा, चंद्रकांत पाटलांची केंद्राकडे मागणी

| Updated on: Oct 28, 2020 | 10:10 PM

कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची साठा मर्यादा चारपट वाढवा, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.

कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची साठा मर्यादा चारपट वाढवा, चंद्रकांत पाटलांची केंद्राकडे मागणी
Follow us on

मुंबई : कांद्याचा साठा करण्यावरील निर्बंधांच्या विरोधात नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद घोषित केल्यामुळे शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीविना पडून आहे तसेच ग्राहकांनाही समस्यांचा सामना करावा लागत आहे. शेतकरी व ग्राहकांच्या हितासाठी कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक विक्रेत्यांसाठी कांदा साठवणीची मर्यादा सध्याच्या २५ टनावरून वाढवून १०० टन करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय व्यापारमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे बुधवारी पत्राद्वारे केली. (Quadruple the stock limit of onion growers Demand Chandrakant patil)

केंद्र सरकारने कांद्याचा साठा करण्यावर निर्बंध लागू केले आहेत व घाऊक विक्रेत्यांना २५ टन आणि किरकोळ व्यापाऱ्यांना २ टन साठा करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयाच्या विरोधात नाशिकच्या कांदा व्यापाऱ्यांनी बंद घोषित केला आहे. त्यामुळे कांद्याचे लिलाव बंद होऊन शेतकऱ्यांवर परिणाम होत आहे. शेतकरी आणि ग्राहकांचे हित ध्यानात घेऊन कांद्याचे लिलाव लवकर सुरू होणे गरजेचे असल्याचं चंद्रकांतदादांनी पत्रात म्हटलं आहे.

कांद्याचा साठा करण्याच्या क्षमतेत बदल करून कांदा उत्पादक क्षेत्रातील घाऊक व्यापाऱ्यांसाठी १०० टन साठ्याची परवानगी देण्यात यावी. महाराष्ट्राच्या बाहेरच्या व्यापाऱ्यांना 30 टनापर्यंत साठ्याची परवानगी द्यावी आणि किरकोळ व्यापाऱ्यांना 10 टनाची मर्यादा ठरविणे व्यावहारिक होईल, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

त्यांनी पत्रात म्हटले आहे की, नाशिक जिल्ह्यात शेतकरी त्यांचा हजारो टन कांदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घेऊन आले आहेत. त्याचप्रमाणे हजारो टन कांदा शेतकऱ्यांकडील कांदा चाळीतही आहे. कांद्याचे लिलाव बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कांद्याचा साठा करण्याची मर्यादा वाढविणे आवश्यक आहे, जेणेकरून व्यापारी कांद्याची खरेदी करू शकतील.

ग्रहकांच्या हितासाठी नाशिकमध्ये खरेदी केलेला कांदा व्यापाऱ्यांना बाजारात आणणेही आवश्यक आहे. तसेच कांद्याचा पुरवठा सुरळीत होईल, यासाठी राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कांद्याच्या वितरणावर लक्ष ठेवणे व गरज पडेल तर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असंही मत त्यांनी पत्रात मांडलं आहे.

(Quadruple the stock limit of onion growers Demand Chandrakant patil)

संबंधित बातम्या

कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये: शरद पवार