कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे ‘खेती बचाओ’ अभियान, राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार

| Updated on: Oct 04, 2020 | 10:55 AM

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून त्याविरोधात काँग्रेस 'खेती बचाओ'  या अभियानाची सुरुवात करत आहे.

कृषी कायद्याविरोधात काँग्रेसचे खेती बचाओ अभियान, राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार
RAHUL GANDHI
Follow us on

अमृतसर : कृषी कायद्याविरोधात काँग्रेस पक्ष अजून आक्रमक झाला असून याविरोधात काँग्रेस ‘खेती बचाओ’  या अभियानाची सुरुवात करत आहे. या अभियानाची सुरुवात पंजाबमधून केली जाणार आहे. त्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी पंजाब दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या या अभियानाचे नेतृत्व स्वतः राहुल गांधी करणार असून ते यासाठी ट्रॅक्टरदेखील चालवणार आहेत. (Rahul Gandhi to drive tractor for Kheti Bachao protest in Punjab)

काँग्रेसच्या या मोर्चात तीन हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात या मोर्चाची सुरुवात मोगा जिल्ह्यातून होणार आहे. मोर्चापूर्वी राहुल गांधी जाहीर सभा घेणार आहेत. कलान ते जटपुरा असा मोर्चाचा मार्ग असेल. या मोर्चाचे नेतृत्व करताना राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार आहेत. हा मोर्चा लुधियाना येथील जटपुरा भागात समाप्त होईल. तिथे एका सार्वजनिक बैठकीत राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते व शेतकऱ्यांशी बातचित करतील.

दरम्यान हरियाणाच्या सीमेवरदेखील राहुल गांधी ट्रॅक्टर चालवणार आहेत. परंतु हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी इशारा दिला आहे की, राज्यात कोणालाही कोणत्याही प्रकारचा मोर्चा काढता येणार नाही, तसेच विरोध प्रदर्शनाची परवानगी दिली जाणार नाही.

आजपासून सहा ऑक्टोबरपर्यंत राहुल गांधी पंजाबमध्ये ट्रॅक्टर मोर्चे काढणार आहेत. या मोर्चांना शेतकरी संघटना समर्थन देतील, असा विश्वास पंजाब काँग्रेसने व्यक्त केला आहे. या ट्रॅक्टर मोर्चांद्वारे 50 किलोमीटरहून अधिक अंतर पूर्ण केले जाणार आहे.

राहुल गांधी यांच्या मोर्चापूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. ज्यात म्हटले आहे की, राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध करण्यासाठी एकत्र यायला हवे.

शिरोमणी अकाली दल एनडीएमधून बाहेर

मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना (Agriculture Bills) विरोध म्हणून शिरोमणी अकाली दलाने (Akali Dal) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. याआधीच अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

देशभरातील शेतकऱ्यांचा विधेयकांना विरोध

पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, या राज्यांतील शेतकऱ्यांसह देशभरातील विविध शेतकरी संघटनांनी कृषी विधेयंकांविरुद्ध आंदोलन पुकराले होते. 25 सप्टेंबरला शेतकरी संघटनांच्या समन्वय समितीने देशव्यापी आंदोलन पुकारले होते. कृषी विधेयकांमुळे बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भूमिका शेतकरी संघटनांसह काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांनी घेतली होती.

संबंधित बातम्या

खासगी कंपन्यांनाही शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा लागणार, काँग्रेसचा केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ‘मॉडल अ‍ॅक्ट’

Agriculture Bills | कृषी विधेयकांना राष्ट्रपतींची मंजुरी, विरोधानंतरही रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

(Rahul Gandhi to drive tractor for Kheti Bachao protest in Punjab)