दगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा

| Updated on: Sep 21, 2020 | 4:09 PM

करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. त्यानंतर मात्र आमच्या हातातील दगडांमुळे तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

दगड आमच्या हातात अन् काचा तुमच्या, राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा
Follow us on

कोल्हापूर: पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही लोकसभा आणि राज्यसभेत कायदे पास कराल पण त्याची अंमलबजावणी कसे करता हे पाहायचे आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने रविवारी राज्यसभेत कृषी क्षेत्राबद्दलची विधेयके मंजूर करुन घेतली. त्यावरुन राजू शेट्टी यांनी टीका केली. (Raju Shetti challenges Modi Government over Agriculture bills passed in Rajyasabha)

केंद्र सरकारने राजकीय पक्षांच्या मदतीने शेतीला कॉर्पोरेटच्या घशात घातले आणि शेतकऱ्यांना शेतीतून बाहेर काढायचा प्रयत्न केला आहे. मात्र, हमीभाव हा शेतकऱ्यांचा हक्क आहे, हे सरकारने याद राखावे, असा इशारा शेट्टी यांनी केंद्र सरकारला दिला.

शेतकऱ्यांचा हमीभावाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न केला, तर करोडो शेतकऱ्यांची पोरं हातात दगड घेतील. त्यानंतर मात्र आमच्या हातातील दगडांमुळे तुमच्या काचा शिल्लक राहणार नाहीत, असा इशारा राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

नरेंद्र मोदी सरकारच्या कृषी विषयक विधेयकांवरुन केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर यांनी राजीनामा दिला होता. हे विधेयक शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत त्यांनी राजीनामा दिला होता. पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये या विधेयकांवरून मोठा असंतोष निर्माण झाला आहे.

तृणमूल, आप आणि काँग्रेस खासदारांच्या विरोधानंतरही गोंधळाच्या वातावरणात राज्यसभेत कृषीविषयक दोन विधेयकं अखेर मंजूर करण्यात आली. आवाजी मतदानाने कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक, तसेच हमीभाव आणि कृषीसेवा विधेयक संमत झाली.

कृषीविषयक विधेयकांवरुन राज्यसभेत विरोधीपक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी या विधेयकाला उत्तर दिले. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी उपसभापतींसमोर असलेली नियम पुस्तिका फाडली. त्याचवेळी काँग्रेस आणि ‘आप’चे खासदार सदनातील वेलमध्ये उतरले.

सरकार शेतकरी विरोधी विधेयक आणत असल्याचा आरोप करत अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

संबंधित बातम्या 

तृणमूल खासदाराने नियम पुस्तक फाडले, वेलमध्ये काँग्रेस-आपचा गोंधळ, राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर

(Raju Shetti challenges Modi Government over Agriculture bills passed in Rajyasabha)