Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका

| Updated on: Nov 24, 2020 | 11:58 AM

दोन सज्ञान व्यक्तींच्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती किंवा सरकार दखल देऊ शकत नाही, असं अलाहाबाद हायकोर्टाने निक्षून सांगितलं

Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका
Follow us on

लखनौ : उत्तर प्रदेशातील योगी सरकार कथित ‘लव्ह जिहाद’ (Love Jihad) कायदा करण्याच्या तयारीत असतानाच अलाहाबाद हायकोर्टाने (Allahabad High Court) महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला मनपसंत जोडीदार निवडण्याचा मूलभूत अधिकार आहे. दोन सज्ञान व्यक्तींना एकत्र राहण्याचा अधिकार कोर्टाने दिला आहे, मग त्या व्यक्ती कोणत्याही धर्माच्या असतील, भिन्नलिंगी असोत किंवा एकाच लिंगाच्या, असं अलाहाबाद हायकोर्टाने स्पष्ट केलं. (Right to live with a person of choice, irrespective of religion, is right to life says Allahabad High Court)

कुशीनगरमध्ये राहणाऱ्या सलामत अन्सारी आणि प्रियंका खरवार यांच्या केसवर अलाहाबाद हायकोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने सज्ञान स्त्री किंवा पुरुषाला आपल्या मनाजोगता जीवनसाथी निवडण्याचा अधिकार दिला आहे. त्यांच्या शांततापूर्ण आयुष्यात कोणतीही व्यक्ती किंवा कुटुंब दखल देऊ शकत नाही, असंही हायकोर्टाने निक्षून सांगितलं.

दोन सज्ञान व्यक्तींच्या संबंधांबाबत राज्य सरकारही आक्षेप घेऊ शकत नाही. कुशीनगरमध्ये राहणाऱ्या सलामत अन्सारी आणि अन्य तिघांच्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने हा निकाल सुनावला. केवळ विवाहाच्या उद्देशाने केलेलं धर्मांतर अस्वीकार्य आहे, हा चांगला कायदा नाही, असंही कोर्टाने सांगितल्याने संभाव्य धर्मांतरविरोधी (लव्ह जिहाद) कायद्याला मोठा झटका मानला जातो.

कोण आहेत सलामत-प्रियंका?

सलामत अन्सारी आणि प्रियंका खरवार यांनी कुटुंबाच्या विरोधात लग्न केलं. 19 ऑगस्ट 2019 रोजी मुस्लिम परंपरेनुसार दोघांचा निकाह झाला. प्रियंका खरवार लग्नानंतर आलिया झाली. (Right to live with a person of choice, irrespective of religion, is right to life says Allahabad High Court)

या प्रकरणात प्रियंका खरवारच्या कुटुंबीयांनी एफआयआर दाखल केला. आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेण्यात आलं, असा आरोप त्यांनी एफआयआरमध्ये केला आहे. आरोपीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत कारवाईची मागणीही कुटुंबाने केली आहे.

“आम्ही दोघंही कायद्याने सज्ञान आहोत. निकाह झाल्यानंतर प्रियंकाने हिंदू धर्माचा त्याग करुन मुस्लीम धर्म स्वीकारला. गेल्या वर्षभरापासून आम्ही दोघं सुखात राहत आहोत. प्रियंकाच्या वडिलांचे आरोप खोडसाळ असून केवळ आकसापोटी केलेले आहेत” असा दावा दाम्पत्याने केला.

प्रियंकाचे वय 21 वर्ष असल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. तिने स्वतःच्या मर्जीने लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे तिला फूस लावून पळवल्याचा कुटुंबाचा दावा कोर्टाने धुडकावला.

“आम्ही प्रियंका आणि सलामत यांना हिंदू आणि मुस्लीम या रुपात पाहत नाही. त्या दोन सज्ञान व्यक्ती आहेत, ज्या स्वतःच्या मर्जीने गेल्या एक वर्षापासून शांततेने आणि सुखाने नांदत आहेत, हे आमचे निरीक्षण आहे.” असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

Sanjay Raut | नितीश कुमारांनी लव्ह जिहादबाबत कायदा करावा, संजय राऊतांचं चॅलेंज

हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात? ‘लव्ह जिहाद’ विरोधात कायदा करा : प्रसाद लाड

(Right to live with a person of choice, irrespective of religion, is right to life says Allahabad High Court)