‘महागठबंधनसाठी काँग्रेस बाधा, बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनीकला गेले’, राजद नेते शिवानंद तिवारींचा घणाघात

| Updated on: Nov 16, 2020 | 12:33 AM

काँग्रेसला 70 पैकी फक्त 19 जागांवर विजय मिळाल्याने महागठबंधनची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. याच मुद्द्यावरुन शिवानंद तिवारी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली (RJD leader Shivanand Tiwari slams Rajul Gandhi).

महागठबंधनसाठी काँग्रेस बाधा, बिहार निवडणुकीवेळी राहुल गांधी शिमल्यात पिकनीकला गेले, राजद नेते शिवानंद तिवारींचा घणाघात
Follow us on

पाटणा : “बिहारमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलं होतं, पण काँग्रेस नेते राहुल गांधी शिमल्यात त्यांची बहीण आणि काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या घरी पिकनीला गेले होते. पक्ष असा चालतो का? काँग्रेस पक्ष जशाप्रकारे चालवला जात आहे त्याचा भाजपला फायदा होत आहे”, असा घणाघात आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांनी केला आहे (RJD leader Shivanand Tiwari slams Rajul Gandhi).

बिहार विधानसभा निवडणुकीत राजदला सर्वाधिक 75 जागांवर यश आलं. पण मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला फक्त 19 जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसने 70 जागांवर उमेदवार उभे केले होते. पण फक्त 19 जागांवर विजय मिळाल्याने महागठबंधनची सत्ता स्थापन होऊ शकली नाही. याच मुद्द्यावरुन शिवानंद तिवारी यांनी ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसवर सडकून टीका केली.

“काँग्रेस पक्ष महागठबंधनसाठी बाधा बनला आहे. काँग्रेसच्या 70 उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण काँग्रेसने 70 प्रचारसभादेखील घेतल्या नाहीत. काँग्रेस नेते राहुल गांधी बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले. प्रियांका गांधी यांना बिहार एवढा परिचित नाही, त्यामुळे त्यादेखील आल्या नाहीत”, अशी टीका शिवानंद तिवारी यांनी केली (RJD leader Shivanand Tiwari slams Rajul Gandhi).

“केवळ बिहारमध्येच असं वातावरण नाही. इतर राज्यांमध्येही काँग्रेस जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढण्यावर भर देते, पण निवडणूक जिंकण्यात अयशस्वी होते. काँग्रेसने याबाबत विचार करायला हवा”, असं शिवानंद तिवारी म्हणाले. दरम्यान, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी शिवानंद यांच्या मुलाखतीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवानंद अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत, असं म्हटलं आहे.

बिहारमध्ये सत्ता एनडीएची, नितीशकुमार सोमवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

दरम्यान, बिहारमध्ये एनडीएला 125 जागांवर विजय मिळाल्याने पुन्हा एकदा एनडीएची सत्ता स्थापन होणार आहे. जेडीयू नेते नितीशकुमार यांनी रविवारी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला. त्यानंतर नितीश कुमार सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम  सोमवारी (16 नोव्हेंबर) दुपारी 11:30 ते 3 वाजण्याच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

बिहारमध्ये राजकीय हालचाली वाढल्या; मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची शिफारस

देवेंद्र फडणवीस एनडीएच्या बैठकीसाठी पाटण्याला, बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अधिकृत निर्णय होणार