औरंगाबादेतील मजुरांच्या मृत्यूने सुन्न! स्थलांतरित कामगारांसाठी रोहित पवारांचं महत्त्वाचं आवाहन

| Updated on: May 08, 2020 | 8:44 AM

कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नये, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं. (Rohit Pawar on Aurangabad Labors Train Mishap)

औरंगाबादेतील मजुरांच्या मृत्यूने सुन्न! स्थलांतरित कामगारांसाठी रोहित पवारांचं महत्त्वाचं आवाहन
(फाईल फोटो)
Follow us on

औरंगाबाद : मालवाहू ट्रेनखाली चिरडून 14 मजुरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना औरंगाबादमध्ये समोर आली आहे. या कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी असल्याच्या भावना व्यक्त करत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली. (Rohit Pawar on Aurangabad Labors Train Mishap)

“औरंगाबादजवळ मालवाहू रेल्वेखाली चिरडून जालना इथल्या स्टील कंपनीत काम करणाऱ्या 15 ते 16 परप्रांतीय कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी सुन्न करणारी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.” असं ट्वीट रोहित पवार यांनी केलं. कामगारांची गावाकडे जाण्याची सोय केली जात असताना त्यांनी जीव धोक्यात घालून प्रवास करु नये, असं आवाहन रोहित पवार यांनी सर्व स्थलांतरित कामगारांना केलं.

नेमकं काय झालं?

औरंगाबाद-जालना रेल्वे मार्गावर करमाड शिवारात ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असावी, असा अंदाज आहे.

वाचा संपूर्ण बातमी : औरंगाबादमध्ये रुळावर झोपलेल्या 14 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून करुण अंत

पहाटे 6.30 वाजताच्या सुमारास अचानक आलेल्या मालवाहू रेल्वेखाली हे मजूर चिरडले गेले. मालगाडीने 19 मजुरांना धडक दिली. यामध्ये 14 मजुरांचा ट्रेनखाली चिरडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, तर पाच जण जखमी आहेत. यामध्ये लहान मुलांचा समावेश असल्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. एमआयडीसीच्या निर्माणाधीन पुलाजवळ ही दुर्घटना घडली.

मजुरांची घरची वाट

‘कोरोना’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे अनेक स्थलांतरित मजूर परराज्यात अडकले आहेत. विशेष ट्रेन किंवा बसच्या माध्यमातून या मजुरांना आपापल्या राज्यात नेण्याची व्यवस्था हळूहळू केली जात आहे. देशाच्या विविध भागातून श्रमिक एक्सप्रेस निघाल्या आहेत.

भूक, पैशांची कमतरता, कोरोनाची भीती आणि कुटुंबाची ओढ अशा विविध कारणांमुळे धीर सुटलेल्या मजुरांनी आधीच आपल्या घरची वाट धरली होती. काही जण हजारो किलोमीटर आणि कित्येक दिवसांच्या प्रवासानंतर घरी पोहोचले, तर कोणाला वाटेतच प्राण सोडावे लागल्याच्या करुण कहाण्या समोर आल्या आहेत.