“कर्नाटक रोज महाराष्ट्राच्या कानखाली मारतो अन् मुख्यमंत्री गाल चोळत विधिमंडळात जातात”

सीमाप्रश्नावरून संजय राऊत आक्रमक मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात...

कर्नाटक रोज महाराष्ट्राच्या कानखाली मारतो अन् मुख्यमंत्री गाल चोळत विधिमंडळात जातात
| Updated on: Dec 21, 2022 | 11:03 AM

मुंबई : महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर (Maharashtra karnataka Seemavad) बोलताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केलीय. सरकार कर्नाटकबाबत काही ठोस भूमिका का घेत नाही? असा सवालही त्यांनी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राचा अपमान करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री गप्प आहेत. ते सीमावादावर बोलायला घाबरतात, असं संजय राऊत (Sanjay Raut) म्हणालेत.

कर्नाटकचे मुख्यमंत्री रोज उठून महाराष्ट्राच्या कानफाटात मारतात अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गाल चोळत विधिमंडळात जातात, असं म्हणत राऊतांनी शिंदेवर घणाघात केलाय.

एक इंच ही जागा महाराष्ट्राला देणार नाही आणि महाराष्ट्राची जागा सोडणार नाही असं वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलं अशी भाषा महाराष्ट्र बद्दल बाजूच्या मुख्यमंत्र्यांनी कधी केला नाही. सीमाप्रश्न जरी जुना असला तरी सुद्धा एकमेकांच्या राज्याबद्दल आदरभाव ठेवून बोललं गेलं पाहिजे, असं राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे क्रांतिकारक मुख्यमंत्री यांचे काय म्हणणे आहे ते समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी जे तीन महिन्यापूर्वी क्रांती केली आहे महाराष्ट्रात त्याच क्रांतीचा भाग कर्नाटकात दिसत आहे. मुंबई काय बोलत आहे त्यापेक्षा महाराष्ट्र काय बोलत आहेत हे महत्त्वाचं आहे, असं राऊत म्हणालेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची बोटचेपीची भूमिका आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी मध्यस्थी केले म्हणजे काय जैसे तेच परिस्थिती आहे. एवढं सगळं होऊन कर्नाटकचे मुख्यमंत्री यांची तशीच भाषा आहे यावर तुम्ही काही जबाब देणार आहे की नाही? तुम्ही यावर काय बोलत का नाही?, असं राऊत म्हणालेत.