मंदिरांवर अनेकांचे उदरनिर्वाह, देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही सरकारची भूमिका नाही : संजय राऊत

| Updated on: Aug 30, 2020 | 1:16 PM

कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे" अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

मंदिरांवर अनेकांचे उदरनिर्वाह, देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही सरकारची भूमिका नाही : संजय राऊत
Follow us on

मुंबई : मंदिरावर अनेकांचे उदरनिर्वाह अवलंबून आहेत. देव मंदिरात बंदिस्त व्हावे ही आमची भूमिका नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. मात्र लोकांच्या आरोग्यासाठी काही निर्णय घेतले आहेत, असे संजय राऊत म्हणाले. (Sanjay Raut on reopening Temples during Unlock)

“मंदिरे बंद करावी हा निर्णयच केंद्राचा होता. मंदिरे अचानक उघडली तेव्हा काय झाले? राम मंदिराचे भूमिपूजन, तिरुपती असा सर्वत्र कोरोनाचा प्रसार झालेला दिसला. देव मंदिरात बंदिस्त व्हावे, ही आमची भूमिका नाही. कोरोना हा मानवनिर्मित नाही, केंद्रातील मंत्रीच म्हणतात की कोरोना ही देवाची करणी आहे” अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला टोला लगावला.

“मंदिराचेही अर्थकारण आहे. अनेकांचे उदरनिर्वाह त्यावर अवलंबून आहेत. पुजारी आहेत, मंदिराबाहेर हार- फुले, प्रसादाची दुकाने असतात. आर्थिक उलाढाल थांबल्याची चिंता आम्हालाही आहे. भाजपच्या घंटानाद आंदोलनाआधीच आमच्यापर्यंत व्यथा पोहोचली. लोकांच्या आरोग्यासाठी निर्णय घेतले असतील, तर भाजपने सरकारशी चर्चा करावी. मंदिर हे उदरनिर्वाहाचेच साधन आहे, भूतलावरची प्रत्येक क्षेत्र उदरनिर्वाहाचे साधन आहे.” असेही संजय राऊत म्हणाले.

“कॉंग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. मात्र अंतर्गत वादामुळे तो जर्जर झाला आहे, याची मला वेदना आहे. मधल्या काळात जे पत्र पाठवल्यावरुन वादळ निर्माण झाले, तर शमले नाही. राहुल गांधी हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी हे वादळ शमवले पाहिजे” असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

“काँग्रेसला चांगल्या सक्रीय नेत्याची गरज”

“काँग्रेसच्या 23 नेत्यांनी जे पत्र पाठवले, ते मत काही चुकीचे नव्हते. पक्षाला एका चांगल्या सक्रीय नेत्याची गरज आहे. मात्र गांधी परिवाराशिवाय कॉंग्रेसला पर्याय नाही, ही जनभावना आहे. एक मोठा पक्ष राजकारणापासून दूर चालला आहे, हे संसदीय लोकशाहीसाठी चांगले नाही” असेही राऊत म्हणाले.

“आमच्याकडे महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, आमच्या पक्षात कोणी चिठ्ठी लिहीली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपासारखा प्रबळ विरोधी पक्ष आहे. महाराष्ट्रातील सरकारला कॉंग्रेसच्या या वादाचा फटका बसणार नाही” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. (Sanjay Raut on reopening Temples during Unlock)

“परीक्षेशिवाय पदव्या वाटा ही आमची भूमिका कधीच नव्हती. परीक्षांच्या तारखा बदला, आमचेही हेच म्हणणे होते. न्यायालयाने ठोस निर्णय दिलेला नाही. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात न्यायालयाने मुंबई पोलिसांवर ताशेरे कुठेच ओढले नाहीत, मात्र तपास सीबीआयकडे दिला. परीक्षेबाबततही न्यायालयाची भूमिका तशीच होती” असे संजय राऊत म्हणाले.

संबंधित बातम्या :

मंदिरात जाऊन देवदर्शन घेणं, हा प्रत्येकाच्या श्रध्देचा भाग, यात राजकारण करु नये – राजेश टोपे

फडणवीस विरोधी पक्षनेता म्हणून जबरदस्त, उद्धव ठाकरेंनी बिगर भाजपशासित राज्यांचे नेतृत्व करावे : संजय राऊत

(Sanjay Raut on reopening Temples during Unlock)