राजकारण बाजूला ठेवा, राष्ट्रीय मुद्दा समजून निर्णय घ्या, IFSC वरुन पवारांचं मोदींना खरमरीत पत्र

| Updated on: May 03, 2020 | 5:42 PM

पंतप्रधानांनी या निर्णयावर पुनर्विचार करावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे. (Sharad Pawar to Narendra Modi on IFSC)

राजकारण बाजूला ठेवा, राष्ट्रीय मुद्दा समजून निर्णय घ्या, IFSC वरुन पवारांचं मोदींना खरमरीत पत्र
Follow us on

मुंबई : आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) मुंबईहून गुजरातमध्ये नेण्यावरुन महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात मोठा वादंग निर्माण झाला आहे. गांधीनगरमध्ये ‘आयएफएससी’ नेल्याने देशाचे आर्थिक नुकसान तर होईलच, मात्र मुंबईचे महत्त्व कमी केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. राजकारण बाजूला ठेवा आणि राष्ट्रीय मुद्दा समजून निर्णय घ्या, असं खरमरीत पत्र शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे. (Sharad Pawar to Narendra Modi on IFSC)

केंद्राचा हा निर्णय देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे महत्त्व कमी करणारा म्हणून पाहिला जाईल. या आश्चर्यकारक निर्णयामुळे जगभरातील वित्तीय संस्थाही चकित होतील, अशी भीती पवारांनी वर्तवली आहे.

एकीकृत प्राधिकरण स्थापित करण्यासाठी व्यापारी समुदाय, बँकर्स आणि वित्तीय संस्थांची मुंबई ही स्वाभाविक निवड असते. त्यामुळे पंतप्रधानांनी या निर्णयावर पुनर्विचार करावा, असे आवाहन शरद पवार यांनी केले आहे.

हेही वाचा : IFSC गुजरातला नेले जात असताना फडणवीसांच्या सरकारने बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही : पृथ्वीराज चव्हाण

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 23 एप्रिलपर्यंत जारी केलेल्या आकडेवारीचा हवाला देत ‘भारतीय बँकिंग क्षेत्रा’त 145 लाख कोटी रुपये जमा असल्याकडे पवारांनी लक्ष वेधलं. ‘एकट्या महाराष्ट्रातील 22.8 टक्के ठेवी यामध्ये आहेत. त्यापाठोपाठ दिल्ली (10 टक्के), उत्तर प्रदेश (7.8 टक्के) आणि गुजरात (5.4 टक्के) ठेवी आहेत. म्हणजेच, 5 लाख 95 हजार कोटी रुपये महाराष्ट्राचे आहेत, तर गुजरातचे केवळ 1 लाख 40 हजार कोटी रुपयांचे योगदान असल्याचं पवार म्हणाले. (Sharad Pawar to Narendra Modi on IFSC)

शासकीय सुरक्षा ठेवींमध्ये महाराष्ट्राचे मोठे योगदान असूनही, गुजरातमध्ये आयएफएससी प्राधिकरण स्थापित करण्याचा निर्णय अहंकारी, चुकीचा आणि अनुचित आहे. महाराष्ट्रातून वित्तीय संस्था आणि व्यावसायिक केंद्रांना दूर नेण्याच्या हालचाली, नजरेने या निर्णयाकडे पाहिले जाईल. यामुळे अनावश्यकपणे राजकीय अशांतता निर्माण होईल, असंही पवारांनी बजावलं आहे.