नियोजनशून्य लॉकडाऊनमुळे लाखो प्रवासी आणि मजुरांचं नुकसान, सोनिया गांधी मोदी सरकारवर भडकल्या

| Updated on: Apr 02, 2020 | 4:41 PM

कोरोनाचं संकंट आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली (Sonia Gandhi slams Modi government).

नियोजनशून्य लॉकडाऊनमुळे लाखो प्रवासी आणि मजुरांचं नुकसान, सोनिया गांधी मोदी सरकारवर भडकल्या
Follow us on

नवी दिल्ली : “देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन जरुरीचं होतं (Sonia Gandhi slams Modi government). मात्र, त्याचं योग्य नियोजन केलं गेलं नाही. त्यामुळे देशभरातील लाखो मजूर आणि प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं”, असा घणाघात काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. कोरोनाचं संकंट आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची व्हिडीओ कॉन्फरंसिंगद्वारे बैठक झाली. यावेळी काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली (Sonia Gandhi slams Modi government).

“डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षेसाठी लागणाऱ्या सर्व महत्त्वाचं साहित्य पुरवलं गेलं पाहिजे. सरकारने कोरोनासाठी नेमलेली रुग्णालये, त्या रुग्णालयांमधील बेडची संख्या आणि इतर सुविधांती सविस्तर माहिती द्यायला हवी. सरकारने शेतकऱ्यांवरील निर्बंध मागे घेतले पाहिजेत”, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली. “काँग्रेसच्या नेतेमंडळींनी आणि कार्यकर्त्यांनी या संकंटसमयी पुढे यायला हवं आणि मदत करायला हवी”, असा सल्ला त्यांनी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.

दरम्यान, मजुरांच्या स्थलांतरावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली. “आम्ही गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनामुळे जगभरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर नजर ठेवून आहोत. या विषयावर आम्ही तज्ज्ञ व्यक्तींशीदेखील चर्चा केली. जगात एकही देश असा नाही जो मजुरांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था केल्याशिवाय त्याने लॉकडाऊनची घोषणा केली असेल”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी यावेळी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली. “उत्तर प्रदेशच्या मजुरांच्या स्थलांतराचे फोटो बघून अत्यंत वाईट वाटलं. आमचे कार्यकर्ते या मजुरांना जेवण आणि औषधं देत आहेत. या मजुरांना अमानुषपणे क्वारंटाईन केलं जात आहे. त्यांच्यावर जंतुनाशकांची फवारणी केली जात आहे”, असं प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या.