वाशिमला पावसानं झोडपलं, 75 हजार हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान

| Updated on: Oct 15, 2020 | 4:47 PM

जिल्हाला तीन दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं आहे. खरिप हंगामातील पिकं काढणीला आली असताना पाऊस सुरू झाला. 75 हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे. Soyabeen Crop Loss in Washim

वाशिमला पावसानं झोडपलं, 75 हजार हेक्टरवरील सोयाबीनचं नुकसान
Follow us on

वाशिम: जिल्हाला तीन दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं आहे. खरिप हंगामातील पिकं काढणीला आली असताना पाऊस सुरू झाला. 75 हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी कापूस गळून पडला आहे. पावसामुळं सोंगून ठेवलेलं सोयाबीन, भाजीपाला, तूर, कापसासह फळ बागांनाही फटका बसला आहे. हवामान विभागानं पुढील तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळं शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.  (Soyabeen crop loss due to rain in washim on 75 thousand hector land)

विदर्भात सोयाबीन म्हणजे पिवळे सोनं समजलं जातं. वाशिम जिल्ह्यातील मालेगाव,रिसोड, मानोरा, मंगरुळनाथ,कारंजा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने चांगलाच तडाखा दिला. यामुळे कापणीला आलेले आणि कापणी करुन ठेवलेल्या 75 हजार हेक्टरवरील सोयाबीन पिकाचं नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात काही ठिकाणी परतीच्या पावसामुळं कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. कपाशीचे बोंड खाली पडले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. वातावरणातील बदलामुळे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर नुकसान सहन करण्याची वेळ आली आहे.

वाशिममध्ये फळबागांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील राजुरा, मुंगळा, मोरगव्हान, एकलासपूर, सह अनेक गावातील संत्रा बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे लाखों रुपयाचे होणार उत्पन्न हातचे गेल्यानं फळबाग उत्पादक शेतकरी संकटात आले आहेत.

पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी हैराण झाला झाला आहे. हजारो हेक्टरवरील उभ्या सोयाबीन ला अंकुर फुटले तर शेतात पाणी साचल्यानं शेकडो हेक्टरवरील सोयाबीन सडलं आहे. शेतकऱ्यांनी काढलेलं सोयाबीन पीक शेतातून घरी नेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. कृषी विभागाने व विमा कंपनीने पंचनामे करून मदत करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित बातम्या :

Maharashtra Rain LIVE | राधानगरी धरणाचा आणखी एक दरवाजा उघडला

उस्मानाबादमध्ये दोन पाझर तलाव फुटले, नागरिकांचे स्थलांतर, एअर लिफ्टिंगची व्यवस्था

(Soyabeen crop loss due to rain in washim on 75 thousand hector land)