इस्लामाबाद : काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी युद्ध हा उपाय नाही, चर्चेतूनच प्रश्न सुटू शकतो, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मांडले. इस्लामाबादमध्ये पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकारांशी इम्रान खान यांनी खास संवाद साधला. त्यावेळी त्यांनी काश्मीरप्रश्नासह विविध मुद्द्यांवर आपली स्पष्ट भूमिका मांडली.
अटलजी म्हणाले होते….
काश्मीर प्रश्न सुटू शकतो का, असे पत्रकारांनी इम्रान खान यांनी विचारले असता, त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबतच्या चर्चेचा प्रसंग सांगितला. “भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नटवर सिंग यांनी मला एकदा सांगितले होते की, जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात काश्मीर प्रश्नावर तोडगा काढण्याच्या ते अगदी जवळ आले होते. म्हणजेच, काश्मीर प्रश्नावर नक्कीच काहीतरी व्यावहारिक उपाय निघू शकतो.” असे म्हणत इम्रान खान यांनी आशा व्यक्त केल्या.
India’s Vajpayi and Natwar Singh once told me they had come really close to resolving Kashmir’s issue back in Gen Musharraf’s era. That means there is definitely a workable solution to Kashmir issue – IK
#PMIKInteractsWithMedia
— PTI (@PTIofficial) December 3, 2018
दोन-तीन मार्ग आहेत…
जोपर्यंत चर्चा होत नाही, तोपर्यंत काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी इतर पर्यायांचा विचार होऊ शकत नाही, असेही इम्रान खान म्हणाले. ज्यावेळी उपस्थित पत्राकारांनी त्यांना काश्मीरप्रश्न सोडवण्यासाठी पर्यायांची विचारणा केली, तर ते म्हणाले, “दोन-तीन मार्ग आहेत, ज्यावर विचार सुरु आहे. मात्र, एवढ्यात ते पर्याय, मार्ग सांगणे उचित ठरणार नाही.”
शांतता प्रस्थापित व्हावी…
भारताविरोधात कोणत्याही प्रकारच्या युद्धाच्या शक्यता इम्रान खान यांनी फेटाळल्या. ते म्हणाले, “अण्वस्त्र संपन्न असलेले दोन देश युद्ध करु शकत नाहीत. कारण त्याचा परिणाम भयंकर होतो. भारतासोबत शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तान गंभीर आहे. पाकिस्तानचं लष्कर आणि आमच्या सरकारचा उद्देश सुद्धा भारतासोबत शातंता प्रस्थापित व्हावी, हाच आहे.”