पूरग्रस्त जिल्ह्यातील घरं, रस्ते आणि शाळा बांधण्यासाठी स्पेशल बजेट : पंकजा मुंडे

| Updated on: Aug 12, 2019 | 4:33 PM

पडलेली घरे, वाहून गेलेले रस्ते हे बांधण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय विशेष पॅकेज देईल आणि पुन्हा या गावांना नव्याने उभं केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

पूरग्रस्त जिल्ह्यातील घरं, रस्ते आणि शाळा बांधण्यासाठी स्पेशल बजेट : पंकजा मुंडे
Follow us on

बीड : पूरग्रस्त भागातील घरे, रस्ते, शाळा, अंगणवाडी पुन्हा बांधण्यासाठी स्पेशल बजेट देऊन हा भाग पुन्हा उभा करु, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी दिली. बीड शहरातील शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळेत त्या (Pankaja Munde) बोलत होत्या. पडलेली घरे, वाहून गेलेले रस्ते हे बांधण्यासाठी ग्रामविकास मंत्रालय विशेष पॅकेज देईल आणि पुन्हा या गावांना नव्याने उभं केलं जाईल, असं त्यांनी सांगितलं.

राज्य सरकारच्या रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन विभागाच्या वतीने आयोजित फळे आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या कार्यशाळेचं उद्घाटन ग्रामविकास आणि महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचीही उपस्थिती होती. पूरग्रस्त भागात आपला जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहभाग नोंदवण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं.

“पूरस्थितीमुळे गेल्या आठवड्यात सर्व राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले होते. पण आज दौरा सुरु केला आहे. कारण, बीड जिल्हाही दुष्काळी जिल्हा आहे. कोल्हापूर, सांगली या ठिकाणी महापुराने लोक त्रस्त आहेत, तर बीडमध्ये दुष्काळाने.. त्यासाठी बीडमधील विकासकामं, शेतकरी मेळावे हे आवश्यक आहे. आजपासून ते कार्यक्रम घेत आहे. या परिस्थितीत समर्पक अशा उपक्रमांनी लोकांना दिलासा मिळेल असे वाटते. तरी कृपया सर्वांनी फटाके ,बँड ,पुष्पहार हे टाळावे त्याऐवजी ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत द्यावी.. आपल्या सहकार्य व शिस्तीची अपेक्षा आहे”, असं आवाहन पंकजा मुंडेंनी कार्यक्रमाला जाण्यापूर्वी केलं होतं.

“दुष्काळग्रस्त भागातील आणि पूरग्रस्त भागातील लोकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडली पाहिजे. इथून सांगली आणि कोल्हापूरकडे प्रत्येकाने जाणे योग्य नाही. तिथल्या यंत्रणेवर तणाव येईल असं कोणतंही काम करु नये. पाणी ओसरल्यावर जास्त गरज भासणार आहे. पूरग्रस्त जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून घरे शाळा, अंगणवाडी , रस्ते, यांच्या नुकसानीचा अहवाल मागितला आहे. त्यांच्या पुनर्बांधणीसाठी स्पेशल बजेट दिलं जाईल,” असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.

पूरग्रस्त भागातील महिलांच्या आरोग्यासाठी विशेष पाऊल

पंकजा मुंडे यांच्या खात्याकडून पूरग्रस्तांना साथीचे आजार आणि रोग, महिला आरोग्याची स्वच्छता राखण्यासाठी ग्रामविकास मंत्रालयाच्या अंतर्गत ‘उमेद’ मार्फत कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हयातील महिलांसाठी विशेष पाऊल उचलण्यात आलंय. प्राथमिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकी आठ अस्मिता प्लस असलेली 45 हजार सॅनेटरी नॅपकिन्सची पॅकेट्स उपलब्ध करून पूरग्रस्त महिलांना पाठवण्यात येणार आहेत.