चालत जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीकडून मदतीचा हात, मजुरांकडून एसटीचे आभार

| Updated on: May 11, 2020 | 3:50 PM

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Helping hand to laborers from ST buses) आहे.

चालत जाणाऱ्या मजुरांसाठी एसटीकडून मदतीचा हात, मजुरांकडून एसटीचे आभार
Follow us on

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला (Helping hand to laborers from ST buses) आहे. या लॉकडाऊन दरम्यान राज्यात अनेक परप्रांतीय मजूर अडकले आहेत. घरी जाण्यासाठी सर्व मजूर आपल्या कुटुंबासोबत पायपीट करत आहेत. या मजुरांच्या मदतीसाठी आता राज्याचे एसटी महामंडळ पुढे सरसावले आहे. एसटी महामंडळाने कालपर्यंत (10 मे) दिवसभरात एकूण 8 हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी (Helping hand to laborers from ST buses) पोहोचवले आहे. अशा कठीण परिस्थितीत एसटीने मदत केल्याने मजुरांनी एसटीचे आभार मानले.

एसटी महांमडळाने विविध आगारातील बसेसद्वारे रस्त्याने पायपीट करत चाललेल्या 5 हजार परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविले आहे. त्यासोबत परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील 3 हजार मजुरांना त्यांच्या जिल्ह्यात सुखरुप आणण्यात  आले.

नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, नागपूर अशा विविध विभागातील सुमारे 250 एसटी बसेसद्वारे मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले आहे. हे सर्व मजूर रस्त्यावरुन अत्यंत धोकादायक पद्धतीने पायपीट करत चालले होते. या मजुरांना त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गाडीमध्ये बसवून सुखरूप राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. त्याचबरोबर परतीच्या प्रवासात सीमेवर अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील सुमारे 3 हजार मजुरांना सुखरूप त्यांच्या इच्छीत जिल्हा ठिकाणी आणण्यात आले. अशा प्रकारे काल दिवसभरात सुमारे 8 हजार मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याचे काम एसटीने केले आहे.

भर उन्हात पायपीट करून व्याकुळ झालेल्या मजुरांना एसटी बसेसमध्ये बसवून आणि सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करीत राज्याच्या सीमेपर्यंत जाऊन सोडण्यात आले. काही ठिकाणी आवश्यकतेनुसार त्यांना पिण्याचे पाणी आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली. याबद्दल या मजुरांनी एसटी महामंडळाचे आणि राज्य शासनाचे आभार मानले आहेत. यापुढे देखील लॉकडाउन संपेपर्यंत अशाच कष्टकरी कामगार-मजुरांना सीमेपर्यंत पोहोचविण्याचे आणि तेथे अडकून पडलेल्या आपल्या राज्यातील मजुरांना सुखरूप घरी घेऊन येण्याची मोहिम एसटी महामंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

“कष्टकरी कामगार-मजुरांनी धोकादायक पद्धतीने पायपीट न करता तुमच्या सेवेसाठी दिवस-रात्र राबत असलेल्या एसटी बसेस मधूनच सुरक्षित प्रवास करावा”, असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

मजूर बस किंवा श्रमिक रेल्वेनेच मूळगावी जातील याची दक्षता घ्या, केंद्राचे राज्यांना सक्त आदेश

Lockdown | हजारो मजूर पायी चालत गावाला, पुन्हा शहरात येण्यास अनेकांचा नकार