नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी समझौता एक्स्प्रेस रेल्वेसेवा आज (रविवारी) पुन्हा सुरु करण्यात येत आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान प्रशासनाकडून ही रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर भारतानेही 1 मार्चला समझौता एक्स्प्रेस रेल्वे सेवा बंद केली होती. मिळालेल्या माहितीनुसार आज पाकिस्तानकडे जाण्यासाठी समझौता एक्स्प्रेस रवाना होणार आहे.
पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी समझौता एक्स्प्रेस सेवा रद्द करत सांगितले की, गुरुवारी लाहोर ते अटारी जाणारी रेल्वे रद्द करण्यात येत आहे आणि ज्या प्रवाशांना भारतात जायचे होते, त्यांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत दिले जातील. ही रेल्वेसेवा दोन्ही देशांमध्ये समोवारी आणि गुरवारी चालते. ही रेल्वे लाहोर आणि पंजाबच्या अटारीला जोडते. तसेच समझौता एक्स्प्रेसची एक लिंक रेल्वे प्रवाशांना अटारीवरुन दिल्ली घेऊन जाते.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर या रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी फक्त 100 प्रवासी या रेल्वेमध्ये प्रवास करत होते. दोन्ही देशातील वाढत्या तणावाचा फटका समझौता एक्स्प्रेसवरही पडलेला दिसत आहे.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा रोष आजही भारतातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. भारतानेही पाकिस्तानमधील दहशतवादविरोधांतील आपली लढाई आक्रमक केली आहे. पुलवामा हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत.