पालघर झुंडीकडून हत्या, योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन, गंभीर, पठाणसह सेलिब्रिटींकडूनही निषेध

| Updated on: Apr 20, 2020 | 1:54 PM

पालघरमधील घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी उद्धव ठाकरेंकडे केली, असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. (Yogi Adityanath calls CM Uddhav Thackeray over Palghar mob lynching)

पालघर झुंडीकडून हत्या, योगी आदित्यनाथांचा उद्धव ठाकरेंना फोन, गंभीर, पठाणसह सेलिब्रिटींकडूनही निषेध
Follow us on

मुंबई : पालघरमध्ये चोरीच्या संशयातून शेकडो जणांच्या झुंडीने केलेल्या तिघांच्या हत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभरातून उमटत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करुन आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली. तर खासदार गौतम गंभीर, कुस्तीपटू बबिता फोगाट, अभिनेता फरहान अख्तर अशा विविध स्तरातील व्यक्तींनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे. (Yogi Adityanath calls CM Uddhav Thackeray over Palghar mob lynching)

‘पालघरमध्ये झालेल्या तिघांच्या हत्येसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी काल संध्याकाळी बोलणे झाले. या घटनेला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची आग्रही मागणी केली’ असं ट्वीट योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

‘पालघरमध्ये संतांची मारहाण करुन हत्या, तेही पोलिसांसमोर. उद्धव ठाकरे सरकार झोपले आहे का? लाज वाटली पाहिजे. सर्व गुन्हेगार कॅमेर्‍यासमोर आहेत. दोषींना कठोर शिक्षा मिळायला हवी’ अशी टीका कुस्तीपटू बबिता फोगाट हिने केली आहे.

मानवी कातडी पांघरुन फिरणाऱ्या जनावरांकडून सर्वात अमानुष, जंगली आणि निंदनीय कृत्य. त्यांनी तिघांचा जीव घेतला आणि एका निराधार 70 वर्षांच्या वृद्ध व्यक्तीच्या विनवणीचा विचारही केला नाही. तिरस्कार आणि लाज वाटते!’ अशा शब्दात खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने संताप व्यक्त केला आहे.

पालघरमध्ये तिघा जणांचा जीव घेणाऱ्या हिंसाचाराचा तीव्र निषेध. झुंडशाहीला समाजात स्थान असू नये. मला आशा आहे मारेकऱ्याना अटक झाली असेल आणि लवकर न्याय देण्यात येईल.

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण यानेही पालघरमधील घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.

दरम्यान, पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी दोन साधू, एक ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.

हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला, ते कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत, असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला.

काय आहे प्रकरण?

गावात चोर-दरोडेखोर शिरल्याची अफवा पसरल्यानंतर गावकऱ्यांनी एकत्रितपणे पहारा देण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी (16 एप्रिल) रात्री उशिरा एक इको गाडी दाभाडी-खानवेल मार्गावरुन जात होती. या गाडीत वाहनचालकासह तिघे जण होते. दोन साधू नाशिकमधील त्र्यंबकेश्वरला निघाले होते.

दाभाडी-खानवेल मार्गावर मोठ्या जमावाने त्यांची गाडी अडवली. त्यांची पूर्णपणे विचारपूस न करताच चोर समजून त्यांच्यावर दगडफेक आणि लाठ्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला. पालघरच्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले गावात ही घटना घडली

पालघरच्या कासा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावाने पोलिसांवरही हल्ला केला. पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. अखेर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात करत सर्वांना ताब्यात घेतलं. डहाणू न्यायालयाने 101 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील 9 आरोपी 18 वर्षाखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. पोलीस इतर फरार आरोपींचा शोध घेत आहेत. (Yogi Adityanath calls CM Uddhav Thackeray over Palghar mob lynching)