चंद्रपूरमध्ये शिकारीसाठी विद्युत तारांचा मोठ्या प्रमाणात वापर, कारवाईसाठी 200 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण

| Updated on: Feb 13, 2020 | 5:03 PM

वनक्षेत्रातील गावांमध्ये शिकारी टोळी अथवा स्थानिक असामाजिक तत्वांच्या माध्यमातून जिवंत वीज तारांचा वापर करुन वन्यजीवांच्या शिकारीचं प्रमाण वाढीस लागलं आहे.

चंद्रपूरमध्ये शिकारीसाठी विद्युत तारांचा मोठ्या प्रमाणात वापर, कारवाईसाठी 200 कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण
Follow us on

चंद्रपूर : जिल्ह्यात प्रवाही विद्युत तारांचा शिकारीसाठी वापर होण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे वनक्षेत्र आहे. या वनक्षेत्रातील गावांमध्ये शिकारी टोळी अथवा स्थानिक असामाजिक तत्वांच्या माध्यमातून जिवंत वीज तारांचा वापर करुन वन्यजीवांच्या शिकारीचं प्रमाण वाढीस लागलं आहे (Killing off forest animals in Chandrapur). या शिकारीच्या प्रकरणात आता वाघ आणि मोठी जनावरे देखील मृत्युमुखी पडत आहेत. हे टाळण्यासाठी वनविभागाने एक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून पुढाकार घेतला आहे.

अगदी महिनाभराच्या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरीत वीज तारांचा वापर करून एका वाघाची शिकार करण्यात आली. स्थानिक शिकारी अथवा शिकारी टोळ्या जंगलातून जाणाऱ्या उच्च दाब वीज वाहिन्यांचा वापर करून तारांचे जाळे पसरवत छोट्या जनावरांना लक्ष्य करत असतात. मात्र, या तारांच्या संपर्कात वाघ-बिबटे-अस्वल यासारखे संरक्षित प्राणी देखील येण्याचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या महिन्यात ब्रह्मपुरी येथे अशाच प्रकारे वाघाची शिकार उघडकीस आली होती.

भद्रावती तालुक्यातील केंद्रीय आयुध निर्माणीच्या जंगलात बिबट्या आणि अस्वलाच्या जोड्यांना देखील प्राण गमवावा लागला होता. वनविभागाने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. वनविभागाचे अधिकारी, वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी याखेरीज वीज केंद्र आणि आयुध निर्माणी यांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची एक संयुक्त कार्यशाळा चंद्रपुरात पार पडली. कार्यशाळेत सुमारे 200 वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले. जंगल भागात शिकार रोखण्यासाठी कर्मचाऱ्यांना नेमके प्रशिक्षण आणि घटनांच्या नोंदी ठेवण्यासोबतच छोट्यात छोटी अनुचित घटनादेखील समन्वय अधिकाऱ्यांकडे सोपवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. चंद्रपूर मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांनी याबाबत माहिती दिली.

आपल्या शेताच्या आसपास फिरणाऱ्या आणि पिकांचे नुकसान करणाऱ्या वन्यजीवांना मारण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. याशिवाय दहशत पसरवणारे वाघ-बिबटे-अस्वल देखील स्थानिक शेतकऱ्यांचे शत्रू ठरतात. यामुळेच पीक वाचवण्यासाठी सौर कुंपणाच्या योजनांची अंमलबजावणी आणि पायी प्रत्यक्ष दौरे आवश्यक असल्याचं मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केलं आहे. आगामी काळात जंगल भागातून असलेल्या वीज वाहिन्यांच्या बिघाडाची माहिती वनविभागाच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती ठरणार आहे. त्यामुळेच या भागात अधिक समन्वय राखणे काळाची गरज बनली आहे, असं मत चंद्रपूरचे मानद वन्यजीवरक्षक बंडू धोतरे यांनी व्यक्त केलं.

जंगलातून जाणाऱ्या उच्च दाब वीजवाहिन्या यासाठी करंट सोर्स म्हणून वापरल्या जातात. एकदा वन्यजीव सापळ्यात अडकले की वाहिन्या ट्रीप होतात. त्यामुळे संपूर्ण भागातली वीज बंद होते. अशा वीज पुरवठा बंद होण्याच्या घटना आता वन विभाग आणि वीज वितरण कंपनीसाठी धोक्याची घंटा ठरणार आहेत. त्यामुळेच स्थानिक पातळीवरील अशा घटनांची नोंद तातडीने घेतल्यास वनगुन्हे-शिकार उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

Use of electricity wires to kill forest animals in Chandrapur