ऐन दिवाळीच्या दिवशी भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा बळी

| Updated on: Oct 29, 2019 | 7:08 AM

दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घरी जात असताना अशाच एका खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला (Wada-Bhiwandi Road Accident). अंबाडी नाक्यावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून पडल्याने जखमी होऊन या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.

ऐन दिवाळीच्या दिवशी भिवंडी-वाडा रस्त्यावरील खड्ड्याने घेतला दुचाकीस्वाराचा बळी
Follow us on

भिवंडी : भिवंडी-वाडा रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून अपघातांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहेत (Bhiwandi pothole accident). या अपघातात अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागत आहे. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजन करण्यासाठी घरी जात असताना अशाच एका खड्ड्यामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला (Wada-Bhiwandi Road Accident). अंबाडी नाक्यावरील उड्डाणपुलावर पडलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळून पडल्याने जखमी होऊन या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. राजेंद्र डोंगरे (वय 42) असं या दुर्दैवी व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने ऐन दिवाळीच्या दिवशीच डोंगरे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे (Wada-Bhiwandi Road Accident).

राजेंद्र डोंगरे हे भिवंडी तालुक्यातील बोरपाडा या गावात राहत होते. मात्र, दिवाळी आपल्या मूळ गावी शेगदा वाडा येथे साजरी करावी, याकरिता ते दिवाळीच्या दिवशी पूजेचं साहित्य घेऊन आपल्या दुचाकीवरुन घराच्या दिशेने जात होते. यावेळी सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदार कंपनीने बनविलेल्या भिवंडी-वाडा-मनोर या बीओटी तत्वावर बनविलेली रस्त्याने जात असताना त्यांची दुचाकी खड्ड्यात आदळून त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. या अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात ठेकेदारासोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनागोदी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

याच महिन्याच्या सुरुवातीला कुडूस येथील नेहा शेख नावाच्या डॉक्टर तरुणीचाही याच रस्त्यावरील खड्याने बळी घेतला होता. मात्र, तरीदेखील प्रशासनाचे डोळे काही उघडताना दिसत नाही. या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे श्रमजीवी संघटनेच्या तरुणांनी अनेकदा आंदोलनं केली, टोल नाका बंद केला. तरी देखील प्रशासन या रस्त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे, कासवाच्या गतीने खड्डे बुजवण्याचे काम सुरू आहे असा आरोप करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सुमारे पंधरा दिवसांपूर्वी या रस्त्यावरील आनगाव आणि वाडा तालुक्यातील वाघोटे येथील टोल वसुली बंद करण्याचे आदेश दिले. परंतु शासनाने अद्यापही या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे प्रशासनाला आणखी किती बळी घ्यायचे आहेत, असा सवाल आता संतप्त नागरिक करत आहेत.