औरंगाबाद: मागील आठवड्यात मराठवाडा आणि परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तर अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 13 आणि 14 तारखेपर्यंत हवामानखात्याने औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत हलका ते मुसळधार पाऊस (Rain forecast in Marathwada region) पडेल अशी शक्यता वर्तवली होती. मात्र आता या पट्ट्यातील बहुतांश भागातील पावसाचा जोर ओसरला असून येत्या काही दिवसात वातावरण मोकळे राहिल, असा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे.
शहरातील वातावरण आजही ढगाळ स्वरुपाचे दिसून आले . हवेत चांगलाच गारवा होता. काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. काल सोमवारी मात्र ऊन-पावसाचा चांगलाच खेळ सुरु होता. काही सेकंद कडक ऊन तर काही सेकंदातच झर झर पावसाच्या सरी कोसळत होत्या. कोसळणारा पाऊसही किती मिनिटं टिकेल याचाही अंदाज येत नव्हता. आज मंगळवारी म्हणजेच 14 सप्टेंबर रोजी शहरातील बहुतांश भागात सूर्यदर्शन झाले नाही. काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या.
नैऋत्य मोसमी पावसाचे सर्व गणित हवेच्या दाबावर चालते. त्यानुसार बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि राज्यभरात पाऊस सक्रीय झाला होता. आता मात्र हे क्षेत्र उत्तरेकडे सरकल्यामुळे पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढचे काही दिवस वातावरण निरभ्र राहिल, असे संकेत आहेत.
मराठवाड्यात येत्या काही दिवसात कसा पाऊस असेल, याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई येथून वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, 14 सप्टेंबर रोजी जालना, परभणी आणि हिंगोलीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र 15 आणि 16 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात संपूर्णपणे निरभ्र वातावरण राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुसळधार पावसाची चेतावणी .
कृपया website ला भेट ध्या https://t.co/JYmdPo98tJ pic.twitter.com/heV1J7CVbw— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 13, 2021
तसेच येत्या 17 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र सध्या तरी त्या पावसासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली नसल्याचे, हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेत . देशातील परतीचा पाऊस राजस्थानात सुरु होतो. त्यानंतर तो पंजाब, हरियाणातील काही भाग, दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात आणि उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून माघारी फिरत असतो. मात्र सध्या तरी राजस्थानात परतीच्या पावसाचे काही संकेत दिसत नसल्याचे चित्र आहे. म्हणून महाराष्ट्रातही मान्सून परतीस विलंब होण्याची शक्यता असल्याचे औरंगाबाद येथील हवामान शास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले आहे. (Weather and rain update in Aurangabad, Marathwada and Maharashtra)
इतर बातम्या-
रोड सायकलिंग स्पर्धेसाठी साई अंबेची निवड, महाराष्ट्र संघात स्थान मिळवणारा औरंगाबादचा पहिलाच खेळाडू!