NIA कोठडीत आनंद तेलतुंबडेंचा कोरोनाबाधिताशी संपर्क, 14 दिवस क्वारंटाईन

| Updated on: Apr 25, 2020 | 7:20 PM

डॉ. आनंद तेलतुंबडे हे कोठडीत असताना त्यांचा एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याचं समोर आलं आहे (Anand Teltumbade and Corona infection risk).

NIA कोठडीत आनंद तेलतुंबडेंचा कोरोनाबाधिताशी संपर्क, 14 दिवस क्वारंटाईन
Follow us on

मुंबई : एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध लेखक आनंद तेलतुंबडे यांनी प्रकृती अस्वाथ्यामुळे केलेला जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. न्यायालयाने त्यांना 8 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. मानवाधिकार कार्यकर्ते आनंद तेलतुंबडे यांच्यावर पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. नुकतंच हे प्रकरण केंद्र सरकारच्या सुचनेनुसार पुणे पोलिसांकडून एएनआयकडे हस्तांतरीत करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे डॉ. आनंद तेलतुंबडे हे कोठडीत असताना त्यांचा एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याचं समोर आलं आहे (Anand Teltumbade and Corona infection risk). त्यामुळे न्यायालयाने त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे येथे झालेल्या एल्गार परिषद प्रकरणी लेखक आनंद तेलतुंबडे हे 14 एप्रिल रोजी एनआयएसमोर स्वाधीन झाले होते. सुरुवातीला त्यांना 18 एप्रिलपर्यंत कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर 25 एप्रिल म्हणजे आजपर्यंत एनआयए कोठडी देण्यात आली होती. आज त्यांना पुन्हा रिमांडसाठी न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी तेलतुंबडे यांच्या वकिलांनी त्यांना श्वसनाचा, मानेचा गंभीर त्रास होत असल्याचं लक्षात आणून देत तात्पुरता जमीन देण्याची विनंती केली. तेलतुंबडे यांना जमिनीवर बसता येत नाही. त्यामुळे त्यांना लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता जमीन द्यावा, असं त्यांनी सांगितलं. मात्र, न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळत त्यांना 8 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

डॉ. तेलतुंबडे यांचा एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीशी संपर्क आल्याचं लक्षात आणून देत त्यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे जामीनाची आग्रही मागणी केली. मात्र न्यायालयाने जामीनाऐवजी त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले. डॉ. तेलतुंबडे यांच्यावतीने मानेचा आणि पाठीचा त्रास होत असल्याचं सांगत फोल्डिंग बेडची आणि पुस्तकं पुरवण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावर न्यायालयाने तुरुंग प्रशासनाला उत्तर देण्यास सांगितले आहे. तुरुंग प्रशासन 26 एप्रिलला यावर आपलं उत्तर देईल त्यानंतर न्यायालय पुढील आदेश देईल.

प्रकरण काय आहे?

पुण्यातील शनिवारवाडा येथे 31 डिसेंबर 2017 रोजी एल्गार परिषद झाली होती. या परिषदेच्या आयोजनामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत, मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेकांचा समावेश होता. मात्र पुणे पोलिसांनी या परिषदेला नक्षलवाद्यांनी अर्थ साहाय्य केल्याचा आरोप केला. यानंतर या परिषदेच्या आयोजकांपैकी 9 जणांना पुणे पोलिसांनी अटक केले होते. यात सुधीर ढवळे, अॅड सुरेंद्र गडलिंग, वरवरा राव, वर्धन गोन्सालवीस, महेश राऊत, अरुण परेरा, रोना विल्सन यांच्यासह आदिवासींच्या न्यायहक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज, शोमा सेन यांचाही समावेश आहे. हा सर्व खटला सुरुवातीला पुणे येथील विशेष कोर्टात सुरु होता. मात्र, केंद्र सरकारने हे प्रकरण एएनआयकडे सोपवले आहे.

संबंधित बातम्या :

एल्गार परिषद प्रकरणी दोषारोपपत्र दाखल, कुणावर काय आरोप?

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंसाठी बी. जी. कोळसे पाटील मैदानात

माओवाद खेड्यात रुजलाय, शहराशी संबंध नाही, पोलिसांनी अपमानित केलं: आनंद तेलतुंबडे

Anand Teltumbade and Corona infection risk