
Patanjali Baba Ramdev: योगगुरू रामदेवबाबा नेहमीच आयुर्वेद आणि योगाबद्दल समाजात जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. रामदेवाबाबांनी आतापर्यंत अनेक आजारांवर आयुर्वेदाच्या माध्यमातून मात करता येते, असे सांगितलेले आहे. ते सोशल मीडियावरही चांगलेच सक्रीय असतात. ते सोशल मीडियावर आपल्या पतंजली प्रोडक्ट्सची जाहिरात करताना दिसतात. तसेच ते आरोग्याची कशी काळजी घ्यावी? काय खावे? याबाबतही सांगताना दिसतात. दरम्यान आता रामदेवाबाबा यांनी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांपासून स्वत:ला कसे वाचवावे आणि या आजारावर कशी मात करावी, याबाबत सांगितले आहे.
पावसाळ्यात जिवाणू आणि बुरशीचा संसर्ग लवकर होते. यामुळेच अन्नातून विषबाधा होण्याचीही शक्यता जास्त असते. पावसाळ्यात अनेकांना सर्दी, खोकला, पोटदुखी आदी समस्या जाणवतात. या काळात ताप, डोकेदुखीचाही त्रास अनेकांना जाणवतो. त्यामुळे अशा आजारांपासून स्वत:चे रक्षण करणे फार गरजेचे आहे. कारण पावसाळ्यात होणाऱ्या या आजारांमुळे शरीर कमकुवत होते. हे आजार होऊ नयेत म्हणून रामदेवबाबांनी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत सांगितले आहे.
रामदेवबाबा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी पावसाळ्यात होणाऱ्या आजारांवर माहिती दिलीय. तुम्हाला पावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला जास्त होत असेल तर ज्येष्ठमधाचे पाणी प्यायला हवे. ज्येष्ठमधाचे पाणी पिल्यास सर्दी-खोकला कमी होतो. ज्येष्ठमधात Glycyrrhizin नावाचा एक घटक असतो. या घटकात विषाणूंवर मात करण्याची क्षमता असते. ज्येष्ठमधात अँटी ऑक्सिडंटही असतात, असे रामदेवबाबा या व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.
पावसाळ्यात तुम्ही आजारी पडले तर काय करायला हवं याचीही माहिती बाब रामदेव यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार तुम्ही पावसाळ्यात आजारी पडले तर चार ते पाच दिवसांसाठी धान्य खाणे टाळावे. त्याऐवजी खजूर, चणे, अंजीर, पपई, उकळलेले सफरचंद खावे. हा नियम पाळल्यास तुम्हाला लगेच फरक जाणवेल, असे रामदेवबाबा यांनी सांगितले आहे.