धुळे लोकसभा : संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंसमोर जागा राखण्याचं आव्हान

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

धुळे : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. धुळ्याची लढतही रंगतदार होणार आहे. महापालिका ताब्यात घेतल्यानंतर आता भाजप लोकसभा तयारीला लागली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळ्यात वक्तव्य केलं, की 2 किंवा 3 मार्चला लोकसभेची अधिसूचना निघू शकते. यावरुन भाजपवर विरोधकांनी टीकाही […]

धुळे लोकसभा : संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेंसमोर जागा राखण्याचं आव्हान
Follow us on

धुळे : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. टीव्ही 9 मराठी या पार्श्वभूमीवर राज्यभरातील लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत आहे. धुळ्याची लढतही रंगतदार होणार आहे. महापालिका ताब्यात घेतल्यानंतर आता भाजप लोकसभा तयारीला लागली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी धुळ्यात वक्तव्य केलं, की 2 किंवा 3 मार्चला लोकसभेची अधिसूचना निघू शकते. यावरुन भाजपवर विरोधकांनी टीकाही केली होती. सध्या धुळे लोकसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा, मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य आणि सटाणा हा परिसर येतो. यात प्रामुख्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे निवडणुकीत विरोधकांच्या हाती अनेक मुद्दे आहेत.

सध्याचे खासदार केंद्रीय संरक्षण मंत्री डॉ. सुभाष भामरे हे आहेत. 2014 मध्ये सुभाष भामरे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे अमरीश पटेल हे उमेदवार होते. जवळ पास 3 लाख 37 हजार 440 मतदार या क्षेत्रात येतात. 2014 मध्ये एकूण 19 उमेदवार वेगवेगळ्या पक्षाकडून तसेच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात होते. त्यात प्रमुख लढत ही भाजपचे डॉ. सुभाष भामरे आणि काँग्रेसचे अमरीश पटेल यांच्यात होती.

धुळ्यातील विधानसभा मतदारसंघ

धुळे शहर : अनिल गोटे, भाजप

धुळे ग्रामीण : कुणाल पाटील, काँग्रेस

शिंदखेडा : जयकुमार रावळ, भाजप

सटाणा : दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी

मालेगाव बाह्य – दादा भुसे, शिवसेना

मालेगाव मध्य – असिफ शेख, काँग्रेस

प्रचाराचे मुद्दे कोणते असतील?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत रोजगार, एमआयडीसी, सुल्वाडे जामफल कानोली धरणातील पाणी पुरवढा योजना, मनमाड-इंदूर रेल्वे मार्ग, मालेगावमधील पावर लूम मजुरांचे प्रश्न असे अनेक प्रश्न होते. यातले काही प्रश्न अजूनही जशास तसे आहेत.

धुळे जिल्हा तसा शेतकरी बहुल असल्याने शेतीसाठी अजूनही आठ तास वीज मिळते, जी पूर्ण वेळ मिळण्याची मागणी आहे. 121 कोटींची भुयारी गटार योजनाही पूर्ण झालेली नाही. 2019 च्या लोकसभेत याच मुद्यांवर पुन्हा राजकारण होऊन प्रचाराचे मुद्दे ठरणार आहेत.

काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे नाव सध्या लोकसभेकरिता उमेदवार म्हणून चर्चेत आहेत. रोहिदास पाटील हे 80 वर्षांचे असले तरी त्यांचा राजकीय अभ्यास, कुशल नेतृत्व आणि मतदारांची मोठी लॉबी ही त्यांची जमेची बाजू आहे.