22 हजार कोटींच्या विमान प्रकल्पासाठी भुजबळांच्या पायघड्या; नाशिकमध्ये येण्याचे टाटांना आवतन!

| Updated on: Nov 05, 2021 | 10:47 AM

केंद्र सरकार आणि टाटा यांच्या प्रकल्पातून तब्बल 6 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात लष्कर आणि हवाई दलासाठी सी 295 प्रकारातील 40 विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे.

22 हजार कोटींच्या विमान प्रकल्पासाठी भुजबळांच्या पायघड्या; नाशिकमध्ये येण्याचे टाटांना आवतन!
छगन भुजबळ आणि रतन टाटा.
Follow us on

नाशिकः तब्बल 22 हजार कोटींचा लष्करी विमान निर्मितीचा प्रकल्प नाशिकमध्ये यावा यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ पायघड्या अंथरल्या आहेत. त्यासाठी थेट रतन टाटा यांना पत्र लिहून नाशिकमध्ये प्रकल्प आणण्याचे आवतन दिले आहे.

रतन टाटा यांच्या समूहाला केंद्र सरकारकडून लष्कर विमान निर्मितीचे तब्बल 22 हजार कोटींचे कंत्राट मिळाले आहे. हा प्रकल्प कुठे न्यायचा यासाठी टाटा समूहाकडून देशभरातील उद्योग स्नेही शहरांमध्ये चाचपणी सुरू आहे. नाशिक या प्रकल्पासाठी सर्वार्थाने योग्य आहे. कारण इथेच एचएल कंपनीय. शिवाय मुंबईपासून नाशिक हाकेच्या अंतरावर. रेल्वे कनेक्टिव्हिटी असो की, विमानसेवा. या साऱ्यांशी जोडलेले. नाशिकचे वातावरणही निसर्ग समृद्ध आणि रमणीय. हे सारे पाहता टाटांनी या प्रकल्पासाठी नाशिकचा विचार करावा, असे साकडे भुजबळ यांनी घातल्याचे समजते. भुजबळ यांच्या या प्रयत्नांचे उद्योग जगताकडून स्वागत केले जात आहे. हा प्रकल्प नाशिकमध्ये आला तर, हजारो नोकऱ्यांची निर्मिती होईल. उद्योगनगरी अजून भरारी घेईल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

प्रकल्पातून 6 हजार नोकऱ्यांची निर्मिती

केंद्र सरकार आणि टाटा यांच्या प्रकल्पातून तब्बल 6 हजार नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत देशात लष्कर आणि हवाई दलासाठी सी 295 प्रकारातील 40 विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. सध्या या प्रकल्पासाठी टाटा समूहाकडून हैदराबाद, बंगळुरू, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये जागेची शोधाशोध सुरूय. हे पाहता भुजबळांनी या प्रकल्पासाठी टाटांसाठी पायघड्या अंथरल्या आहेत.

सिपेट नाशिकमध्ये

बहुचर्चित सिपेट प्रकल्प नाशिकमध्येच होणार असून त्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्राने तत्त्वतः मान्यता दिली असून, त्यांना रितसर पुढी आठवड्यात प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिकमध्ये हजारो रोजगारांची निर्मिती होणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. खरे तर केंद्र सरकारने पनवेल येथे हा प्रकल्प उभारायला मंजुरी दिली होती. मात्र, त्यासाठी 15 एकर जागा हवी होती. पनवेल येथे या प्रकल्पासाठी इतकी जागा मिळाली नाही. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळला जावून तो राज्याबाहेर जाण्याची भीती होती. याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांना मिळाली. त्यांनी हा प्रकल्प नाशिकमध्ये आणण्यासाठी चक्रे फिरवली. या प्रकल्पासाठी जमीन देण्याची तयारी दर्शवली. याबाबत कंपनीच्या प्रमुखांची भेट घेतली. त्यांच्यासमोर आपली बाजू मांडली. सोबतच नाशिकमध्ये हा प्रकल्प उभारावा यासाठी दिल्लीमध्ये जोर लावला होता. (22,000 crore aircraft manufacturing project to be set up in Nashik, Chhagan Bhujbal’s letter to Ratan Tata)

इतर बातम्याः

नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर; साहित्य संमेलनानंतर मान्यवरांचा गौरव

कृषिमंत्री म्हणतायत 4 हजार कोटींपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, तर विम्यासाठी ‘स्वाभिमानी’चे भुसे यांच्या घरासमोर आंदोलन