राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार; दिलीप वळसे-पाटील यांची माहिती

| Updated on: Jun 28, 2022 | 7:18 PM

शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार; दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
राज्यात 7231 पोलीस शिपाई भरती प्रक्रिया पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार; दिलीप वळसे-पाटील यांची माहिती
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई: मुंबई: महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) राज्यात 2020 मधील पोलीस शिपाई संवर्गातील 7231 रिक्त पदे भरण्यास मंजुरी (7231 vacancies in Police Peon Cadre) देण्यात आली आहे. तसेच शासनाने महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Home Minister Dilip Walse-Patil) यांनी सांगितले.

 

असे असणार गुणांची विभागणी

पोलीस शिपाई पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 50 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावणे (20 गुण), 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण तर महिला उमेदवार 800 मीटर धावणे (20 गुण). 100 मीटर धावणे (15 गुण), गोळाफेक (15 गुण) असे एकूण 50 गुण असणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरूष) पदासाठी शारीरिक चाचणी एकूण 100 गुणांची होणार आहे. यामध्ये पुरुष उमेदवारासाठी 5 कि.मी. धावणे (50गुण), 100 मीटर धावणे (25गुण), गोळाफेक (25 गुण) असे एकूण 100 गुण असणार आहेत.

किमान 50 टक्के गुण पाहिजेच

यावेळी शारीरिक चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी पात्र असणार आहेत. लेखी चाचणीमध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुध्दीमत्ता चाचणी, मराठी, व्याकरण या विषयावर आधारीत प्रश्न विचारले जाणार आहेत. लेखी चाचणीमध्ये विचारण्यात येणारे प्रश्न बहुपर्यायी प्रकारचेही असतील अशी माहितीही गृहमंत्री दिली वळसे-पाटी यांनी सांगितले.

परीक्षा मराठी भाषेत

ही परीक्षा मराठी भाषेत घेण्यात येणार असून तसेच या लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटे असणार आहे. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य असणार आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील अशी माहितीही यावेळी देण्यात आली आहे.
या पोलीस भरतीमधील लेखी परिक्षा विशेष बाब म्हणून OMR (Optical Mark Recognition) पध्दतीने घेण्याबाबत शासनाने मान्यता दिली आहे.

 ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध

पोलीस महासंचालक यांनी प्रत्येक पोलीस घटकासाठी गठीत केलेले निवड मंडळ शारीरिक व लेखीमध्ये मिळवलेल्या गुणांचे एकत्रिकरण करून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. या नव्या दुरुस्तीचा लाभ पोलीस दलास होणार असून, त्यांना ताकदवान मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या बदलाचा मोठा फायदा होईल असा विश्वासही गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांनी व्यक्त केला आहे.