चिपळूण – मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai-Goa highway)आज संध्याकाळच्या सुमारास काही काळ ठप्प झाला होता. एका मोटारसायकल स्वाराचा (bike rider death) ट्रकखाली आल्याने मृत्यू झाल्याने, त्याच्या संतप्त नातेवाईकांनी आणि संतप्त नागरिकांनी हा रस्ता रोखून (road block) धरला होता. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप या तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि संतप्त नागरिकांनी केला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ज्या कंत्राटदाला दिले आहे, त्याने घटनास्थळी येऊन या प्रकाराची माहिती घ्यावी आणि जबाबदारी स्वीकारावी, अशी या संतप्त नागरिकांची मागणी होते. सुमारे तासभर याचा परिणाम मुंबई-गोवा हायवेवरील वाहतुकीवर झाला होता. वाहतूक ठप्प झाली होती. गेले अनेक काळापासून मुंबई-गोवा हायवेचे काम सुरु आहे, या रस्त्यावरुन प्रवास करताना मुठीत जीव घेऊनच प्रवास करावा लागतो.याकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे.
दुपारी सव्वा चारच्या सुमारास चिपळूम जवळच्या पाल नाका परिसरात हा अपघात घडला. खड्डे चुकवत रस्त्यावरुन जात असलेल्या एक तरुण बाईकवरुन जात होता. एका अवजड वाहनाच्या चाकांखाली हा अचानक आला आणि त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही माहिती त्याच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचले. त्यांच्यासोबत काही संतप्त नागरिही घटनास्थळी जमा झाले. त्यांनी या खड्ड्यांमुळेच तरुणाचा मृत्यू झाल्याचा आक्षेप घेत, मुंबई-गोवा हायवेवरच रास्तारोको सुरु केला. सुमारे तासभर त्यामुळे वाहतूक पूर्णपणे खोळंबली होती. संतप्त नागरिकांनी त्या ठिकाणी ठेकेदार आणि सरकारचा निषेध केला. या रास्ता रोकोची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या संतप्त नागरिकांचा राग विशेष करुन कंत्राटदारावर होता.
मुंबई-गोवा हायवेचे काम गेल्या काही वर्षांपासून सुरु ्सले तरी अद्याप ते पूर्ण झालेले नाही. या रस्त्यावरुन प्रवास करणे हे एक दिव्यच मानले जाते. अनेक ठिकाणी काम सुरु असल्याने रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी कामांमुळे डायव्हर्सन्सही दिलेली आहेत. त्यातच पावसामुळे अनेक ठिकाणी खडडे झालेले आहेत. ही परिस्थिती कधी सुधारणार, हा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. आता गणेशोत्सवही तोंडावर आलेला आहे. अशा काळात कोकणात जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. असेच दुर्लक्ष सुरु राहिल्यास आणखी काही अपघात या रस्त्यांवर होण्याची शक्यता आहे. याकडे सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे.