नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन

| Updated on: Jan 20, 2021 | 8:19 PM

खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी आज आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास करण्याबाबतचे निवेदन दिले. (Aditya Thackeray said Narveer Bahrji Naik's tomb area will develop)

नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करणार, आदित्य ठाकरेंचं आश्वासन
aaditya thackeray
Follow us on

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या बाणुरगड (ता. खानापूर, जि. सांगली) येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी लवकरच बैठक घेऊन सविस्तर नियोजन करण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे (Aditya Thackeray said Narveer Bahrji Naik’s tomb area will develop).

खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी आज आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळ परिसराचा विकास करण्याबाबतचे निवेदन दिले. या निवेदनाची तातडीने दखल घेत बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल, असं आदित्य ठाकरेंनी आमदार बाबर यांना सांगितले. त्याचबरोबर समाधीस्थळाचा विकास करण्यासाठी तातडीने बैठक बोलवण्याची सूचना ठाकरे यांनी दिली.

“शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याचपद्धतीने शिवरायांसाठी कार्य करणाऱ्या मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. नरवीर बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरीमधील आपल्या कौशल्याने स्वराज्य स्थापनेत महत्वाचे योगदान दिले. त्यांचे कार्य जगासमोर येण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचे समाधीस्थळ असलेल्या बाणुरगड भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगिण विकास केला जाईल”, असे ते म्हणाले.

दरम्यान, आमदार बाबर यांनी यावेळी पारे (ता. खानापुर, जि. सांगली) येथील दरगोबा मंदीर परिसराच्या विकासासाठीही पर्यटन योजनेंतर्गत निधी उपलब्ध होण्याबाबत निवेदन सादर केले (Aditya Thackeray said Narveer Bahrji Naik’s tomb area will develop).