…म्हणून संजय राऊतांच्या पोटात दुखतंय; शिंदे गटाच्या नेत्याचा निशाणा
Deepak Kesarkar on Sanjay Raut : शिवसेना शिंदे गटाचे नेते, मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी जोरदार टीका केला आहे. नाशिकच्या जागेवरही दीपक केसरकर यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर...
शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. आमच्या जागा आम्हाला मिळाल्या आहेत. त्यांच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. जेव्हा शिवसेना एकत्र होती तेव्हा ती फोडण्याचं पुण्यकाम संजय राऊतांनी केलेले आहे. संजय राऊत जास्त करून शरद पवारांचं ऐकतात. उद्धव ठाकरेंसोबत ते कितपत आहेत, याबद्दल शंकाच आहे. त्यांच्या अशा वागण्यामुळे एव्हढे आमदार खासदार निघून गेले. त्यांची ओढ काँग्रेस आणि शरद पवारांकडे आहे, असं दीपक केसरकर म्हणाले. संजय राऊतांनी भाजप धनुष्यबाण संपवत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
ठाकरेंवर निशाणा
बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर पक्ष बंद करेल. या विचाराच्या विपरीत उद्धव ठाकरे वागले. म्हणून शिवसैनिक आज आमच्यासोबत आहेत. बाळासाहेबांचे स्वप्न मोदींनी पूर्ण केले. त्यामुळे देशात 400 च्या वर जागा निवडून येतील, असा विश्वासही केसरकरांनी व्यक्त केला आहे.
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तेढ आहे. आज सकाळी संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम यांच्यावर टीका केली होती. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत कुणावरही टिका करू शकतात. ते एक वेगळं रसायन आहे, असं केसरकर यांनी म्हटलं.
‘त्या’ जागांवरून महायुतीत वाद?
रत्नागिरी- सिंधुदुर्ग आणि नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसतं आहे. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागेसंदर्भात चर्चा अंतीम टप्प्यात आहे. सर्वानुमते जागेचा निर्णय होणार आहे. तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढतायेत. जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून निवडून द्यायच्याय. उमेदवारांची निवड झाल्यानंतर सर्व वातावरण बदलेल. 48 पैकी 45 जागा महायुतीच्या निवडून येतील, असं केसरकर म्हणाले.
राहुल गांधीच्या भाषणात कुठलही सातत्य नाही. ज्याला काहीही अर्थ नसतो अशी वक्तव्य ते करतात. राष्ट्राचा विचार झाला पाहीजे. नरेंद्र मोदी आज जगासाठी आदरणीय आहेत. आपल्या देशाने वेगाने प्रगती केलीय. आज आपण पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भारत एक महासत्ता बनत आहे. पुढच्या काळात अनेक क्षेत्रासाठी काम केलं जाणार आहे, असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.